भोर (प्रतिनिधी) – अतिवृष्टीचा तालुका म्हणून ओळख असलेल्या भोर तालुक्यातील हिर्शीडोशी खोऱ्यातील भोर-महाड या घाट मार्गावारील निगुडघर ते वरंधा घाटापर्यंतचा काही ठिकाणचा रस्ता जीवघेणा झाला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निगुडघर ते वरंधाघाट प्रवास करणाऱ्यांसाठी हा रस्ता म्हणजे “सावधानतेचा इशारा’च म्हणण्याची वेळ आली आहे.
भोर तालुका हा पावसाचे माहेरघर आहे. या मार्गावरील शिरगावला भोरची चेरापुंजी म्हणूनच ओळखले जाते. येथे 3500 मिमीपर्यंत पाऊस बरसतो. त्यामुळे येथील रस्ते पावसाळ्यात प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत असतात. तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील भोर ते वरंधा घाट हा दरवर्षी पावसाळ्यात प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो. भोर ते वरंधा घाट हा सुमारे 55 किमीचा रस्ता आहे. जवळपास 25 किमीचा घाटाचा रस्ता आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या घाटाच्या रस्त्यावर दरड कोसळणे, रस्ता खचणे, रस्त्यावर माती पडणे असे प्रकार घडले आहेत. या वर्षीही घाट रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने अशा घटना घडण्याची शक्यता आहे. भोर वरंधा घाट ते महाड (रायगड) हा रस्ता महाडकडे जाण्यासाठी जवळचा आहे. त्यामुळे अनेकजण महाड (रायगड) कडे जाण्यासाठी या रस्त्याला पसंती देतात. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असते. जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा रस्ता नागमोडी वळणाचा आहे.
घनदाट जंगल असल्याने वरंधा घाट पर्यटकांसाठी पावसाळ्यात एक पर्वणीच ठरतो. भोर वरंधा घाट हा वर्दळीचा रस्ता आहे. वरवंड ते वरंधा घाट रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तर हिर्डोशी येथील सोमजाई पूल पावसाळ्यात खचून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा अपघातांमुळे जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हे भाग त्वरीत दुरुस्त व्हावेत अशी मागणी केली आहे. या भगात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्ये खड्डे पडल्याने व साइडपट्ट्या भरल्या नसल्याने प्रवास करणे अवघड होत आहे. वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. कुडली ते दुर्गाडी या रोडची हीच स्थिती आहे ते कधीही उघडू शकते. त्यामुळे भोर वरंधा घाटापर्यंत रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. या रस्त्यांची कामे लॉकडाऊनमुळे होऊ शकली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगितले जाते. गेल्या वर्षी कोंढरी येथे पावसाळ्यात दरड कोसळ्याने 39 कुटुंब इतर ठिकाणी तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली होती, तर रस्त्यांची स्थिती अगदी जीवघेणी होती. त्यामुळे या परिसरातील नागरिक आजही दहशतीखाली आहेत. तेव्हा रस्ते तरी चांगले असावेत, अशी माफक अपेक्षा येथील नागरिकांची आहे.
भोर-वरंधा घाटापर्यंतच्या रस्त्याचे काही किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणचे काम सुरू आहे. या रस्त्यावर पाणी येऊ नये, म्हणून रस्त्यालगत चर काढले आहेत. गटर काढणे, खड्डे भरण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
– एस. डी. हल्लोळ, शाखा अभियंता बांधकाम विभाग
भोर-वरंधा घाटपर्यंतच्या रस्त्याची दर पावसाळ्यात वाईट स्थिती असते. त्यामुळे येथील स्थानिकांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्ता दुरुस्त करावा यासाठी दरवर्षी मागणी करावी लागते; परंतु याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. येत्या पावसाळ्यात कोणाचाही खोळंबा होणार नाही याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.
– विलास मादगुडे, माजी उपसरपंच कोंढरी