नवी दिल्ली – वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या भारतातील 56 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे त्यात व्यवस्थापन पातळीवरील आठ वरीष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे. कंपनीच्या फेररचनेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे व्यवहार अधिक किफायतशीर व कार्यक्षमपणे चालवण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे असे कंपनीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या कंपनीची भारतात 28 ठिकाणी कॅश ऍन्ड कॅरी केंद्रे कार्यरत आहेत. या 56 जणांची सेवा खंडीत करण्यात आली असली तरी यापुढील काळात मात्र आणखी काहीं कर्मचारी काढून टाकण्याचा कंपनीचा मनोदय नाही असे वॉलमार्ट कडून सांगण्यात आले आहे. वॉलमार्टने देशात आणखी सहा ठिकाणी घाऊक विक्री केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या विक्रीत सन 2019 मध्ये 22 टक्के इतकी वाढ झाली आहे.