नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी सोमवारी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून (का) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले. मोदींनी कायद्याला विरोध असणाऱ्या पाच टीकाकारांची निवड करून टीव्हीवरील प्रश्नोत्तरांच्या सत्राला सामोरे जावे.
त्यामुळे जनतेला त्या कायद्याबाबत स्वत:चा निष्कर्ष काढता येईल, असे चिदंबरम यांनी म्हटले. माजी गृहमंत्री असणाऱ्या चिदंबरम यांनी ट्विटरवरून मोदींवर शाब्दिक वार केला. संबंधित कायदा नागरिकत्व देण्यासाठी असून काढून घेण्यासाठी नाही, असे मोदी म्हणतात. मात्र, काबरोबरच एनपीआर आणि एनआरसीमुळे अनेकांचे नागरिकत्व जाईल असे आम्हाला वाटते.
श्रोत्यांना शांत करण्यासाठी मोदी उंच व्यासपीठांवरून बोलतात. पण, प्रश्न स्वीकारत नाहीत. मोदी टीकाकारांशी बोलत नाहीत. त्यामुळे टीकाकारांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे प्रश्नोत्तरांच्या सत्राला सामोरे जाण्याचा एकमेव पर्याय दिसतो. मोदी माझ्या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद देतील अशी आशा करूया, असे चिदंबरम यांनी म्हटले.