शिक्रापूर (वार्ताहर) – शिक्रापूर गावामध्ये यापूर्वी झालेली दहशत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराची सर्व माहिती नागरिक आणि ग्रामस्थांना झालेली आहे. गावातील दहशत आणि भ्रष्टाचारातून मुक्त होण्यासाठी मतदार शिक्रापूर ग्रामविकास आघाडीला पसंती देतील असा विश्वास माजी सरपंच तसेच शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचे बापूसाहेब जकाते यांनी व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.
गावातील शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक दोनमधून गौरीताई दत्तात्रय राऊत, रेखाताई सचिन मांढरे व गौरव अरुणदादा करंजे हे तिघे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचे बापूसाहेब जकाते म्हणाले, यापूर्वी गावामध्ये झालेली दहशत आणि गावामध्ये झालेला भ्रष्टाचार नागरिकांच्या आणि मतदारांच्या लक्षात आलेला आहे.
गावातील दहशतीच्या वातावरणातून नागरिकांना मुक्त व्हायचे स्वप्न नागरिक पाहत असल्यामुळे ग्रामस्थ आणि मतदार शिक्रापूर ग्रामविकास आघाडीला विजयी करून यावेळी सत्ता बदल करतील असा आम्हाला विश्वास आहे. प्रचारादरम्यान मतदारांची हीच मानसिकता आम्ही जवळून अनुभवचली आहे.
आज प्रचाराची सांगता होत असताना ग्रामविकास आघाडी पॅनलचे सर्व उमेदवार आणि पॅनल प्रमुखांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. याप्रसंगी माजी उपसभापती जयमाला जकाते, माजी ग्रामपंचायत सदस्य गीताताई चव्हाण, संजय केवटे, दत्तात्रय राऊत, भाऊसाहेब केवटे, आशिष चव्हाण, गणेश चव्हाण, दत्तात्रय भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, स्वनिल मांढरे, किशोर केवटे, सुजित जकाते, प्रवीण खेडकर, सुदर्शन मांढरे, संदीप पवार, बंडू गायकवाड, सतीश भुजबळ यांसह आदी महिला आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी मतदारांशी संवाद साधताना शिक्रापूर येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये शिक्रापूरच्या वाढत्या नागरिकरणामुळे अनेक ठिकाणी नवीन कॉलन्या उदयास आलेल्या आहेत.
त्यांना ग्रामपंचायतच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने नवीन झालेल्या सर्व कॉलन्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ते, गटार, लाईट, पाणी या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे गौरव करंजे यांनी सांगितले.
तर युवतींना स्पर्धा परीक्षा देता याव्यात यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून युवतींना उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करणार असल्याचे सांगत महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध योजनेतून शेतीपयोगी साहित्य मिळवून देणार असल्याचे गौरीताई राऊत व रेखाताई मांढरे यांनी सांगितले.