मुंबई, दि. 13 – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. जमीन भूसंपादनातील अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत समन्वय अधिकारी नेमण्यात यावा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत विधानभवन येथे राज्यमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस आमदार हिरामण खोसकर, बाबासाहेब पाटील, डॉ. बी. एन. बास्टेवाड, सुनील माळी, विठ्ठल सोनावणे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
बनसोडे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भूसंपादनाला वेग आला आहे. राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या महामार्गासाठी भूसंपादनाचे काम होत आहे. कोणत्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गाचे काम आणखी लांबणीवर पडू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यातील काही ठिकाणी भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी समन्वय अधिकारी नेमल्यास या कामातील अडचणी सोडविणे सोपे होईल, असेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत थेट खरेदीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जातो आहे. याशिवाय झाडे, पिके, विहिरी, बांधकाम यांचे मूल्यांकन करून त्याची वेगळी रक्कमदेखील संबंधित मालकांना दिली जात आहे. मात्र येत्या आठ ते दहा दिवसात इगतपुरीचे आमदार खोसकर यांच्याबरोबर जाऊन याबाबत प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही बनसोडे यांनी यावेळी सांगितले.