अकोट – वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध पखवाज वादक ह.भ.प. विठ्ठल महाराज साबळे व त्यांच्या पत्नी गोकुळाताई साबळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
गेल्या काही दिवसापासून साबळे महाराजांना अस्वस्थ वाटत होते. महाराजांनी कोरोना टेस्ट केली असता. कुटुंबातील सर्वच पॉझिटिव आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना ता.२८ पहाटे पाच वाजता साबळे महाराजांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यांच्या पत्नी गोकुळा ताई साबळे यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने साबळे कुटुंबासह वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा ऋषी साबळे यांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विठ्ठल महाराज साबळे हे आपल्या मृदुंग वादाना करिता व किर्तन ,भागवत, विशेषता भाषण शैली करीता सुप्रसिद्ध होते. महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले व नंतर आपल्या गावी आल्यानंतर गावागावात जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार ,प्रसार केला. आपल्या कारकिर्दीमध्ये महाराजांनी बरेच मृदंग ,वादक ,कीर्तनकार घडवले. समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची शांतीवन अमृत तीर्थ प्रगतीपथावर आणण्या करीता साबळे महाराज यांचा मोठा वाटा आहे.
महाराज विदर्भ वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे नुकतेच विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पद सुद्धा महाराजांना मिळाले होते. महाराजांनी वारकरी संप्रदाय हा राजकीय क्षेत्रातही मागे नसावा याकरिता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी घेऊन उभे राहीले होते. आंदोलन, मोर्चा , अमरण उपोषण, सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम कुठेही असला तरी महाराज सर्वांच्या समोर असायचे.