एक अत्यंत वेगळ्या विषयावरची रोमहर्षक कादंबरी म्हणून प्रभाकर पेंढारकर यांच्या “रारंग ढांग’ या कादंबरीकडे बघितले जाते. 175 पानांच्या या साहित्याऐवजात वाचक प्रारंभापासून गुंतून पडतो ते थेट शेवटच्या वाक्यापर्यंत आणि हेच या कादंबरीचे यश म्हणावे लागेल. 1981 पासून आजवर पंधरा-सोळा आवृत्त्या निघणे हेही ही कादंबरी दमदार असल्याचे लक्षण आहे.
‘रारंग ढांग’ या नावापासूनच वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही कादंबरी हिमालयाच्या सान्निध्यात घडते. डोंगरांच्या उभ्या कड्यांना ढांग म्हणतात. हिमालयाची तुलनेने तरुण असलेली डोंगररांग आणि या डोंगररांगेत भारतीय सैन्य जीवाची बाजी लावून अहोरात्र पहारा देत उभे असते. प्रत्यक्ष लढणारे सैन्य आणि रस्ता बांधणी करणारा सैन्यातील बांधकाम विभाग या दोहोंच्या समन्वयाने येथे विविध प्रकारची कामे सुरू असतात. इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरलच्या हुद्याचा अधिकारी बॉर्डर रोडचा प्रमुख डायरेक्टर जनरल असतो. शिवाय परिसरातील प्रत्येक प्रकल्पावर एक प्रमुख इंजिनिअर असतो.
या गुढ योगी वाटणाऱ्या हिमालयाच्या बॉर्डर रोड विभागात इंजिनिअर म्हणून रुजू होण्यासाठी चोवीस वर्षांचा तरणाबांड विश्वनाथ मुंबईहून सिमल्याला आणि सिमल्याहून रामपूरकडे सतजलच्या साथीने निघतो. एका बाजूला प्रचंड मोठ्या उंचीचे अक्राळविक्राळ हिमालयाचे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला शेकडो फूट खोलीवर असणारी खळखळती सतलज यातून जाणाऱ्या रस्त्यावर विश्वनाथचा प्रवास सुरू होतो. बॉर्डर रोडमध्ये लागण्यापूर्वी विश्वनाथ युनायटेड कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला असतो. पण तेथे उबगून काहीतरी वेगळे करावे या विचाराने तो सैन्यसेवेत दाखल होतो. विश्वनाथ विद्यापीठात पहिला आलेला सुवर्णपदकाचा मानकरी असतो. हिमालयात रस्ते बांधण्याची विजीगिषू वृत्ती असणारा हा तरुण चांगली नोकरी सोडून सैन्यदलाच्या हिमालयस्थित कार्यालयात लेफ्टनंट कर्नल जेम्स राईट यांच्याकडे दाखल होतो. कर्नल राईट त्याला मेजर बंबा यांच्याकडे सोपवितात. मेजर बंबा हे कोणतीही कामगिरी स्वीकारून ती पूर्ण करण्यासाठी ख्यातकीर्त असतात, पण सिव्हिलियन्सच्या नोकरीधर्माविषयी त्यांना फारशी आस्था आणि खात्री नसते. मेजर बंबांसोबत कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, कॅप्टन मिनू खंबाटा हे लोक काम करीत असतात.
मेजर बंबा लेफ्टनंट असणाऱ्या विश्वनाथला डिटॅचमेंट थ्रीच्या प्रकल्पावर कामाला लावतात. या कामावर बहादूर हा नेपाळी माणूस मजूर पुरवित असतो. आजुबाजूच्या खेड्यापाड्यातून मजूर आणि छोटी खेचरासारखी घोडी, ज्यांना हिमालयात तट्ट म्हणतात, ती कामाला लावणे आणि सगळ्यांचा चरितार्थ भागविणे हे येथील सर्वसामान्य जनतेचे काम. डिटॅचमेंट फोरवर नव्यानेच लागलेला कॅप्टन अमर हा देखील एक हुशार अधिकारी असतो. डिटॅचमेंट थ्रीचे काम ज्याठिकाणी होणार असते, त्या ढांगाच्या वरच्या भागातून हिंदुस्थान-तिबेट रस्ता गेलेला असतो आणि याच परिसरात डोंगराच्या वर भारत-चीनच्या सीमारेषाही अधोरेखित झालेल्या असतात. या परिसरातील तणावाचे वातावरण बघता तेथे आता नव्याने काही ठाणी उभी करावयाची असतात आणि यामुळेच तेथे वाहने जाऊ शकतील असा रस्ता आणि एक पूल निर्माण करणे अनिवार्य होते. समुद्रसपाटीपासून नऊ हजार फूट उंचीवरचा हा रस्ता म्हणजे एकप्रकारे जागतिक विक्रमच असतो.
विश्वनाथ कामावर रुजू होतो, पण मेजर बंबांचा त्याच्यावर फारसा विश्वास नसतो. हिमालय हा ठिसूळ असल्याने काम करावयाचा भाग नेमकेपणाने तपासून घेतला पाहिजे असे विश्वनाथला वाटते. त्याप्रमाणे तो ढांगांची पाहणी करावयास प्रारंभ करतो. खरे तर त्या भागाची यापूर्वी पाहणी झालेली असते, पण विश्वनाथला तेथे पुन्हा एक पाहणी कराविशी वाटते. विश्वनाथ कामगिरीवर निघण्यापूर्वीच 56 व्या मैलाच्या दगडाजवळ लॅंडस्लाईड होतो आणि त्यात गोविंदराम या उत्साही माणसाचे जाणाऱ्या-येणाऱ्यांना चहा पुरविणारे छोटेसे हॉटेल जमीनदोस्त झालेले असते. जमिनीपासून तीनशे फुटांवर विश्वनाथचे काम सुरू होते आणि चिंतनही. त्याच्या लक्षात येते, येथे थांबायला कुणालाच वेळ नाही. हा रुद्रमंगल हिमालय, अत्यंत लहरी निसर्ग, ही काटक असणारी गढवाली माणसं आणि त्यामध्ये जीवाची बाजी लावून वावरणारे जवान व माझ्यासारखी सिव्हिलियन्स या साऱ्यांचा मेळ घालून फक्त काम करीत राहायचे. काही झाले तरी दु:ख करायचे नाही. अपघात वा विपरीत परिस्थितीत जखमी झालेल्यांना मलमपट्टी करणारा डॉक्टर सावरस हा तेथला फ्रॅक्चर एक्सपर्ट. तोही सतत कामात.
विश्वनाथ तेथे मुंबईहून आलेला आहे पण खरे तर विश्वनाथचे मूळ गाव अंबेरी. गावी फक्त वडील. ते अत्यंत तत्त्वनिष्ठ स्वातंत्र्यसैनिक. मुलगा मुंबईत असला तरी ते मात्र गावीच. मुलाच्या कोणत्याही इच्छेविरुद्ध न वागणारे. मुंबईहून निघण्यापूर्वी वेळ असतो म्हणून विश्वनाथ एका आर्ट गॅलरीला भेट देतो आणि तेथे सागरलहरींचे चितारलेले एक चित्र त्याचे लक्ष वेधून घेते. ते चित्र कोणी उमा नावाच्या चित्रकर्तीचे असते. आवडलेले चित्र खरेदी करावे म्हणून तो तेथे चित्र दाखविणाऱ्या एका तरुणीला चित्राविषयी विचारतो, तेव्हा तुम्ही उमाशीच संपर्क करा असे त्याला सांगण्यात येते. उमाचा पत्ता घेऊन जेव्हा तो उमाच्या घरी पोहोचतो, तेव्हा आर्ट गॅलरीत भेटलेली तरुणीच उमा असल्याचे त्याच्या लक्षात येते. उमा तिचे चित्र त्याला देते आणि हिमालयात गेल्यावर तेथून पत्र लिहा असे विश्वनाथला सांगते. त्यांच्यातील स्नेहबंधांचा तो पहिला धागा असतो.
हिमालयात पोहोचल्यावर नामोल्लेख न करता विश्वनाथ पहिले पत्र उमाकडे रवाना करतो. तीनशे फुटांवर तपासणी करण्यास प्रारंभ केल्यावर तेथील काही भाग विश्वनाथला ठिसूळ वाटतो आणि सॉईल सॅम्पलसाठी तो कॉम्प्रेसरची मागणी करतो. तो त्याला मेजर बंबांना न विचारताच पुरवला जातो. तपासणी केल्यानंतर त्याची त्या भागाच्या ठिसूळपणाची खात्री पटते. विश्वनाथच्या हाताखाली दहा जणांची टीम असते. तपासणीनंतर त्याविषयीचे लेखी रिपोर्ट घेऊन तो बंबांकडे येतो व तीस फुटांचा भाग ठिसूळ असून त्याला आधार देण्याची गरज आहे असे सांगतो. एक तर आधार द्या नाहीतर पुलाची जागा बदला असे त्याचे म्हणणे असते, पण बंबांना ते मान्य नसते. मुळात ही तपासणी करण्याची गरजच नव्हती असे ते म्हणतात पण विश्वनाथसारख्या स्वतंत्र विचार करणाऱ्या हुशार अभियंताला ते मान्य होत नाही.
आपले म्हणणे मांडण्यासाठी तो कर्नल राईट यांच्याकडे भेटायला जातो. राईट पूर्वीच्या तपासणीचे पेपर्स मागविण्याचे आश्वासन त्याला देतात. अर्थात त्याचे राईटना भेटणेही बंबांना आवडत नाही. विश्वनाथसोबत कोल्हापूरजवळच्या हणमंतवाडीचा एक तरतरीत जवान सर्जेराव गायकवाडही असतो. सर्जेरावच्या घरी त्याची आई सारसाबाई एकटीच असते. तिला सर्जेरावाचे दोनाचे चार हात करून तातडीने सुनमुख बघावयाचे असते, पण रस्ता आणि पुलाच्या कामाची तातडी असल्याने बंबा त्याला रजा देत नाही. डिटॅचमेंट थ्रीचे काम धडाक्यात सुरू होते. अवघड असे ड्रिलिंग करण्याचा मोठा आवाज परिसरात निनादत राहतो. बहादूर आणि त्याचे सहा सहकारी हे काम करीत असतात. दिवसभर काम करायचे आणि डोंगरालगतच्या गुहेत कुठल्याही सुुविधेविना गुडूप झोपायचे हा या साध्यासुध्या लोकांच्या दिनक्रम. काम सुरू असतानाच अचानक विश्वनाथची बदली होते. आपण मागविलेल्या कागदपत्रांची ही शिक्षा आहे हे त्याला उमगते आणि तो पुन्हा एकदा कर्नल राईटना भेटून आपली बाजू मांडतो आणि त्याची बदली रद्द होते.
विश्वनाथसोबत असणारा कॅप्टन मिनू हा मनमौजी स्वभावाचा माणूस असतो. आपल्या जीवनात एखादी सुंदर तरुणी यावी असे त्याचे स्वप्न असते. एक दिवस तो विश्वनाथला घेऊन तो खालच्या स्पिलू या गावी जातो. तेथे शांताराणी या तरुणीशी त्यांची भेट होते आणि तिच्या माध्यमातून कामासाठी तीन तट्टांची व्यवस्था होते. ते तट्टू घेऊन शांताराणी आणि तिचा भाऊ राम दुसऱ्या दिवशी कामावर येतात, पण दुर्दैवाने सुरुंगाच्या स्फोटात रामला त्याचा पाय गमवावा लागतो, पण विश्वनाथच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे येथे कुणाला थांबायला वेळच नसतो.
विश्वनाथ सकाळी लवकर कामावर येवून थेट रात्रीच तंबूमध्ये परतत असतो. जेवणालासुद्धा त्याला फारशी फुरसद नसे. हा रारंग ढांगमधला रस्ता इंग्रजी सी आकाराचा असतो. बोलता बोलता काम सुरू होऊन आठ महिने पूर्ण होतात. बनलेल्या रस्त्यावरून आणि बोगद्यातून आज ट्रक हळूहळू जाऊ शकेल अशी प्रगती होते. पुढे असलेल्या पुलाचे कामही जोरात सुरू होते. विश्वनाथ आणि त्याची टीम अतिशय जोरात काम करीत असते. त्यामुळे विक्रमी वेळात ते पूल तयार करतात. त्याच दरम्यान पुलाचे काम सुरू असताना विश्वनाथचा हात पुलाच्या गर्डरवरून निसटतो आणि तो खालच्या शेकडो फूट खोल असणाऱ्या सतलजमध्ये पडता पडता वाचतो. हा सारा आठ महिन्यांचा घटनाक्रम हळूवारपणे एकेक पत्रातून विश्वनाथ उमाला कळवित असतो आणि उमाही त्याला तेवढ्याच उत्कटतेने उत्तर पाठवित असते. काम आवाक्यात आल्याचे पाहून विश्वनाथच्या आग्रहाने सर्जेरावची लग्नासाठीची रजा मंजूर होते.
कामाचा अखेरचा टप्पा सुरू होतो आणि एक दिवस अगदी आकस्मात सर्जेराव आणि बहादूरसोबतचे सहा गुरखे डोंगर कोसळून त्या ढिगाखाली गाडले जातात. हा भाग तोच असतो, ज्याची ठिसूळ म्हणून विश्वनाथला सुरुवातीपासून भीती वाटत असते. विश्वनाथ शून्यावस्थेत जातो तर बहाद्दूर आपल्या साथीदारांच्या मृत्यूच्या दु:खाने सतलजमध्ये उडी मारून आत्महत्या करतो. त्याचवेळी उमा सर्जेरावच्या घरी विश्वनाथने पत्रात सांगितल्याप्रमाणे लग्नाचा आहेर म्हणून गणपतीची सुबक मूर्ती आणि कुंकवाचा करंडा पाठवते. दुसऱ्या दिवशी विश्वनाथ अपघाताच्या जागेवर पोहोचतो. त्याच्या सोबत सुभेदार ठाकूर असतात. तो बाकीच्या लोकांना गोळा करतो आणि कोसळलेल्या ढिगारा साफ करण्यास प्रारंभ होतो. जागा मोकळी होताच तेथे आठ खड्डे खोदण्याची ऑर्डर तो काही सहकाऱ्यांना देतो, काहींना सिमेंट आणावयास पाठवतो. काहींना उरलेल्या स्टीलचे तुकडे करावयास सांगतो. त्याला आता तेथे आधाराचे आठ खांब कमीत कमी वेळात उभे करावयाचे असतात.
मृत्यू पावलेले सात लोक आणि एक तो स्वत: असे आठ जणांच्या स्मृतिीप्रित्यर्थ ते खांब उभे राहतात आणि वरच्या डोंगराला आधार देतात. हे काम होईपर्यंत बंबांना तिकडे येणे शक्य होत नाही आणि त्यामुळे असे काही येथे चालले आहे हेही त्यांना माहीत होण्याचे कारण नसते. बंबा जेव्हा तेथे येतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. कॅप्टन विश्वनाथने लष्कराची शिस्त मोडली, सामानाची अफरातफर केली म्हणून त्याला ते तत्काळ नोकरीतून काढतात आणि अटक करतात. विश्वनाथची अटक अर्थातच कोर्टमार्शलपर्यंत त्याला घेऊन जाते. लष्करातर्फे विश्वनाथची बाजू मांडण्यासाठी त्याला मेजर दुर्गाप्रसाद हे वकील दिले जातात, पण विश्वनाथला त्यांची गरज वाटत नाही.
टास्क फोर्सला आणलेल्या विश्वनाथचा खटला कर्नल बादल यांच्यापुढे सुरू होतो. दुर्गाप्रसाद, मिनू खंबाटा हे विश्वनाथला मौन पाळायला सांगतात पण विश्वनाथ गप्प बसत नाही. तो गुन्हा नाकारतो आणि त्याने त्या ठिसूळ भागाविषयी यापूर्वी पूर्वकल्पना देऊन त्यातील धोका समजावण्याविषयी केलेले प्रयत्न कोर्टाच्या लक्षात आणून देतो. शिवाय मानवी प्रयत्न आणि लष्कराची शिस्त यातील भेदही स्पष्ट शब्दात परखडपणे मांडतो. दोन्ही बाजू ऐकून कोर्ट प्रत्यक्ष अपघाताच्या व तेथे झालेल्या बांधकामाच्या जागेवर जाऊन पाहणी करते आणि एक चकीत करणारा निकाल देते. कोर्ट विश्वनाथला या गुन्ह्यातून दोषमुक्त करते, पण त्याचबरोबर लष्कराची त्याची सेवाही संपुष्टात आणते. कादंबरीच्या शेवटी रस्त्यात असलेल्या मृत्यू पावलेल्या जवानांच्या स्मृतिस्थळाला फुले वाहून परतीच्या वाटेवर प्रवास करणारा विश्वनाथ वाचकांच्या नजरेसमोर दिसतो. एक अत्यंत वाचनीय अशा कादंबरीचा हा नायक कादंबरी संपल्यावरही अनेक दिवस वाचकांच्या मनाभोवती रेंगाळत राहतो यात शंका नाही.
डॉ. विनोद गोरवाडकर