नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना उद्देशून भाषण केले व करोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारला सहकार्य करा तसेच विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले होते. त्याचीच री ओढत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील देशवासीयांना हेच आवाहन केले आहे.
जेव्हा एक देश म्हणून आपण एकत्र येतो तेव्हा जगातील कोणत्याही संकटावर मात करता येते. आज हीच परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आली आहे. हार न मानता याचा मुकाबला करा, केंद्र तसेच राज्य सरकारने सांगितलेल्या सगळ्या सूचनांचे आपण पालन करणे आवश्यक आहे.
करोनाने संपूर्ण जगभरात खूप मोठा धोका निर्माण केला आहे, याचा यशस्वी सामना करायचा असेल तर काही दिवस घराबाहेर पडणे टाळावेच लागेल. जगभरातील प्रगत देशही आज अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तसेच सर्वात अग्रेसर प्रणाली असूनही करोनासमोर हतबल झाले आहेत, त्यापासून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे, असेही कोहली म्हणाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन घोषित केला आहे. भारत करोनामुक्त करण्यासाठीचे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, त्याला सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे,असेही कोहलीने सांगितले आहे.