मुंबई – विराट कोहली मानसिकरीत्या संकटात सापडला होता. त्यामुळेच त्याच्या बॅटमधून धावा होताना दिसत नाहीत. यावर उपाय म्हणून अखेर बीसीसीआयनेच कंबर कसली व संघाचे मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक (Paddy Upton) पॅडी अप्टन यांना कोहलीशी चर्चा करून त्याला या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर काढण्याची केलेली विनंती तंतोतंत खरी ठरली. कोहलीने आशिया करंडक स्पर्धेत दोन अर्धशतके फटकावत आपण भरात येत असल्याचे सिद्ध केले. मात्र, याचे संपूर्ण श्रेय त्याने अप्टन यांना दिले आहे.
कोहलीला भविष्यातही असा त्रास होऊ नये यासाठी ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत बीसीसीआयने अप्टन यांची कोहलीसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय संघाचे मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
अप्टन हे खेळाडूंना मानसिक दृष्टया कणखर बनवण्यासाठी काम करतात. करोना काळानंतर खेळाडूंची मानसिकता नकारात्मक बनलेली पाहून कर्णधार रोहित शर्मानेच त्यांची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी बीसीसीआयला केली होती. त्यातच कोहली सध्या अपयशाचा सामना करत होता व त्याने वर्कलोड तसेच विश्रांतीसाठी अनेक मालिकांमधून विश्रांतीही घेतली होती.
कोहली सकारात्मक होत आहे – अप्टन
कोहलीशी केवळ चर्चा करून यश येणार नव्हते त्यामुळेच मी चार स्तरीय योजना आखली. सामना नसलेल्या दिवशी कोहलीशी 45 मिनिटांचे एक याप्रमाणे एकाच दिवसात चार सत्रात मार्गदर्शन केले. सराव करताना, प्रत्यक्ष सामना खेळताना तसेच दिवसातील कोणत्या वेळी सर्वात जास्त नकारात्मक वाटते अशा विविध गोष्टींची माहिती घेतली व माझ्याकडे असलेले उपाय सुचवले. त्यामुळे कोहलीही थोडा रिलॅक्स झाला असून त्याच्या देहबोलीतून तो सकारात्मक होत असल्याचेही दिसत आहे. मात्र, शंभर टक्के रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल, असे अप्टन यांनी सांगितले आहे.
आता अमिरातीत सुरू असलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात यशस्वी पुनरागमन केले. मात्र, यावेळी त्याने माध्यमांशी संवाद साधताना मी मानसिकरीत्या थकलो होतो असे सांगितले होते. त्याच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत बीसीसीआयने अप्टन यांना कोहलीशी संवाद साधत त्याला यातून बाहेर काढण्याची विनंती केली होती. त्यांच्या मदतीमुळेच कोहली पुन्हा एकदा ट्रॅकवर आला.