– अमित डोंगरे
भारतीय क्रिकेट संघात एक नवी गोष्ट घडली. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहली हाच चक्क रोहित शर्मासह सलामीला फलंदाजीसाठी आला. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला या मालिकेत चांगली सलामी मिळालेली नव्हती, ती उणीव रोहितसह फलंदाजाला येत कोहलीने भरून काढली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कधीकाळी असेच नवल ठरतील असे निर्णय घ्यायचा व ते यशस्वीही ठरत होते. त्याच धर्तीवर कोहलीने हा निर्णय घेतला. हा एक नवा पायंडा पडला असून तो देखील यशस्वी ठरावा हीच अपेक्षा आहे.
जवळपास अडीच दशकांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय सामन्यांत सलामीला फलंदाजी करण्याचा हट्ट धरला होता व तत्कालीन प्रशिक्षक अंशूमन गायकवाड यांनी त्याचा हट्ट पुरवत त्याला सलामीला फलंदाजीला पाठवले. या डावात सचिनने 80 पेक्षा जास्त धावांची खेळी केली व नंतर घडलेला इतिहास आपल्या सगळ्यांनाच अवगत आहे त्याचा वेगळा ऊहापोह करण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की तुमच्या संघातील जे सर्वोत्तम फलंदाज आहेत किंवा त्यांच्या केवळ खेळपट्टीवर असण्यानेच समोरच्या संघाची पाचावर धारण बसते त्यांनाच सर्वाधिक चेंडू खेळायला मिळाले पाहिजेत तरच ते समोरच्या संघावर वर्चस्व राखत मोठी धावसंख्या उभारू शकतात व कोणत्याही खेळपट्टीवर तसेच कोणत्याही गोलंदाजाचा पालापाचोळा करु शकतात.
बेस्ट मॅन फॉर द जॉब, हेच समीकरण पाचव्या टी-20 सामन्यात कोहलीने जुळवून आणले. नव्या चेंडूवर धावा वेगाने काढता येतात तसेच चेंडू नवा असल्याने मारलेले फटके देखील बॅटच्या मधोमध बसल्यावर चौकार व षटकारांची आतषबाजी करणे सोपे ठरते. जे काम गेली कित्येक वर्षे सचिनने केले तेच आता कोहलीलाही करायचे आहे. जर मर्यादित षटकांच्या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याचा कोहलीचा निग्रह असेल तर प्रत्येक सामन्यात समोरच्या संघाला जगातील पहिल्या दोन फलंदाजांना बाद करण्यासाठी जंग जंग पछाडावे लागेल. या दोघांनी आजवरच्या कारकीर्दीत सध्याच्या सर्व गोलंदाजांवर हुकुमत राखली आहे. टी-20 मालिका संपली असून एकदिवसीय सामन्यांची मालिका येत्या मंगळवारपासून सुरु होत आहे.
1980 च्या दशकात कृष्णम्माचारी श्रीकांतने मर्यादित षटकांच्या सामन्यात पहिल्या पंधरा षटकांत थर्टी यार्ड सर्कलच्या वरुन फटकेबाजी करत वेगवान सलामी देण्याचा पायंडा पाडला. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्क ग्रेटबॅच व नंतर श्रीलंकेचे सनथ जयसूर्या व रमेश कालुवितर्णा यांनी तर सातत्य राखत पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांची पिसे काढण्याचे कार्य सातत्याने केले. सामना 20 षटकांचा असो किंवा 50 षटकांचा पहिल्या पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा केल्या तर नंतर येत असलेल्या फलंदाजांचे काम सोपे ठरते व गोलंदाजांचीही दिशा व टप्पा चुकतो.
रोहितसह सलामीला शिखर धवन, लोकेश राहुल, नवोदित इशान किशन यांनी डावाची सुरूवात केली आहे पण तरीही कोहलीने पाडलेला हा नवा पायंडा पाचव्या टी-20 सामन्यात यशस्वी ठरला असून त्यात सातत्य राहिलेले भारतीय संघासाठी तर फायद्याचे ठरेलच पण समोरच्या संघासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकते. केवळ इशान किशनच्या कारकीर्दीचा विचार केला गेला तरच या जोडीत बदल होऊ शकतो अन्यथा कोहलीलाही सचिनप्रमाणेच जास्त संधी मिळेल व त्याचा लाभ संघालाही होईल.