विराट कोहली टी-२० विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. विश्वचषक ऑस्ट्रेलियात होत असल्याने तेथील खेळपट्ट्यांवर खेळणे विराट नेहमीच पसंद करतो. ऑस्ट्रेलियात खेळताना विराटने ५५ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ६६ डावांमध्ये ५६.४४ च्या सरासरीने ३,२७४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने याठिकाणी त्याच्या कारकिर्दीत ११ शतके आणि १७ अर्धशतके ठोकली आहेत. विराट ऑस्ट्रेलियात भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
राहुलच्या जागी पंत संघात खेळणार? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं…
कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात ६७ सामन्यांमध्ये ४२ पेक्षा जास्त सरासरीने ७ शतके आणि १७ अर्धशतकांसह ३,३०० धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटला आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात सचिनच्या या विक्रमाला मोडीत काढण्याची संधी असणार आहे.
ऑस्ट्रलियात क्रिकेट खेळताना विराट कोहलीच्या नावावर खरंच अविश्वसनीय असे विक्रम आहेत. टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, विराटने १३ सामन्यांच्या १२ डावात ८५.०० च्या सरासरीने ५९५ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर नाबाद ९० ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ५०० पेक्षा जास्त टी-२० धावा करणारा विराट एकमेव भारतीय खेळाडू आहे.
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्या ३० ऑक्टोबरला सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानसाठीही हा सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण भारताला या सामन्यात पराभव मिळाला तर पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत.