संगमनेर, (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये दोन गटात या ना त्या कारणांवरून हमरीतुमरीनंतर त्याचे पर्यावसान हाणामारी व पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल होण्यात होत आहे. सामाजिक तेढ मिटून शहरात शांतता, सलोखा व बंधूभाव निर्माण व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी 6 वाजता प्रांत कार्यालयाच्या सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती.
परंतु तेथील दोन गटातील खडाजंगी व हमरीतुमरीने एकंदरीतच त्या शांतता कमिटीच्या बैठकीत फक्त अशांतताच पहायला मिळाली. जोरदार झालेल्या खडाजंगीत पोलीस अधिकाऱ्यांनीही काढता पाय घेतला. त्यामुळे या शांत बैठकीचे रूपांतर अशांततेत बदललेले पाहायला मिळाले.
या बैठकीमध्ये दोन गटाचे प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व संघटनांचे प्रतिनिधी बोलविण्यात आले होते. या ठिकाणी इतिहासात घडून गेलेल्या घटनांचे दाखले देत एकाच बाजूने री ओढण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून झाल्याने दुसऱ्या गट कमालीचा नाराज होऊन त्यांनी एकमुखी निर्णय घेत सभागृहाचा त्याग केला. विविध मुद्यांवरून दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी यावेळी पहायला मिळाली. जो तो आमचेच ऐका, आम्हीच कसे बरोबर असल्याच्या अविर्भावात बोलत होते.
एक वेळ अशी आली की, दोन समाजातील कार्यकर्ते एकमेकांना भिडायला लागले मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने एक गट सभागृहातुन बाहेर गेला. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. दरम्यान, संगमनेर शहरातील जोर्वेनाका परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री जमावाने काही विद्यार्थ्यांना मारहाण केली होती.
या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी गुरुवारी सायंकाळी प्रांत कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती.
उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीसाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, साकूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला असतानाही कोणी मोर्चा काढला नाही, अशी भूमिका माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांनी मांडली.
त्यावर संयम ठेवत सगळ्या बैठकीतील एकंदरीत सूर ऐकत असलेले शिवसेनेचे अमोल कवडे यांनी शेख यांना शेवटी जोरदार प्रतिउत्तर दिले. आम्हाला सांगण्याऐवजी तुम्ही का मोर्चा काढला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. यामुळे सभागृहामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. एक कार्यकर्ता आपले मत मांडत असताना भाषण करू नका, सूचना मांडा, असे त्याला सांगण्यात आले.
एकंदरीत शांतता कमिटीच्या बैठकीचे काहीही फलित निघाले नसल्याचेच समोर आले. मात्र, काही समाजकंटकांमुळे गावचे वातावरण बिघडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होत असून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी त्या समाजकंटकांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.