कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागात शिमगोत्सोवात पूर्वी साखर गाठीला मोठे महत्त्व होते. होळीच्या दिवशी पूजेसाठी लहान मुलांच्या गळ्यात साखरगाठी असायची. तिचा प्रसाद म्हणून वाटप केला जात असे. जीवनात गोडवा यावा हा त्यामागे चा मोठा उद्देश असे. मात्र, आधुनिक काळात साखरगाठीची ही परंपरा दुर्मिळ होत आहे.
सोशल मीडियाच्या युगात होळी सणाला ही आधुनिक तिचा साथ चढत आहे. साखरगाठीची जागा आता कोल्ड्रिंक्स फास्ट फुडने घेतली आहे. दोन दिवसांवर होळीचा सण अला असला तरी, अजूनही दुकानात जशी पाहिजे तशी गर्दी होताना दिसत नाही. त्यामुळे साखरगाठीच्या मागणीत घट होताना दिसत आहे.
होळीला रंग आणि पिचकारी यांचे जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व साखर गाठीचेही असते. होळी आणि गुढीपाडव्याला साखरगाठीचा विशेष मान असतो. पूर्वी साखरगाठीची खरेदी ही मोठ्या प्रमाणात होत असे. आता त्यात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.
मावळ तालुक्यात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. तालुक्यात कोळी, कुणबी, आगरी, भंडारी, आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेल्या भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळीच्या दिवशी पुरणपोळी, तांदळाची पापडी, ऊस व साखरगाठी याचा नैवेद्य होळीच्या पूजनाच्या वेळी दिला जातो.
पण या काळात साखरगाठी गळ्यात घलण्यात लहान मुलांनाही आवडत नसल्याने किंवा कपडे खराब होत या भीतीने मुलांसाठी साखरगाठी खरेदी होत नाही. याचा परिणाम साखरगाठी उत्पादनावर होत आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.