नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिंसाचार सुरु आहे. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर आता या प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. यानंतर राज्यात शांतता निर्माण करण्याचे आश्वासन केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारकडून देण्यात येत असले तरी मणिपूरमध्ये शांत होण्याची चिन्ह अजूनही दिसत नाही. कारण राज्यातील चुराचांदपूरमध्ये पुन्हा एका कुकी आणि मेतई समाजामध्ये हिंसाचार झाल्याची माहिती मिळत आहे. या हिंसाचारामध्ये चार जण जखमी आणि एकाच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरम यांनी या घटनेविषयी दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कुकी समाजातील काही लोकांनी सुरक्षा रक्षकांवर देखील हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. तर यावेळी सुरक्षा रक्षकांनी देखील या लोकांना चोख उत्तर दिल्याचे म्हटले जात आहे. गुरुवारी कांगवाई, क्वाकटा, फुगाकचाओ इखाई आणि तेरखोंगशांगबी भागात गोळीबार करण्यात आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी देखील तात्काळ घटनास्थळी पोहचले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ त्या गावकऱ्यांची सुटका देखील केली. परंतु तरीही त्या ठिकाणी गोळीबार सुरुच होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी (26 जुलै) काही लोकांनी घरांची तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. या लोकांनी घरांची तोडफोड करुन त्यांनी नंतर ती घरे जाळून देखील टाकली. त्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये गोळीबार सुरू झाला.
दरम्यान, मणिपूर पोलिसांनी या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या लोकांसंदर्भात माहिती दिली आहे. यावर बोलतांना पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दहशतवाद्यांनी सीमा भागात गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना इंफाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर गृह मंत्रालयाकडून कठोर कारवाई करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. तर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 35 हजार अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तसेच महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी शुक्रवार (28 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील पार पडणार आहे. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान सुरु आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसेच संसदेत देखील या मुद्द्यावर काही तोडगा निघणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सद्या प्रशासन कसोशीचे प्रयत्न करताना दिसत आहे.