मुंबई – खासदार संजय राऊत यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यामध्ये ठाकरेंनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही मग त्याचे श्रेय का घेता ? यासह विविध मुद्यांवरून ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता भाजपने देखील ठाकरेंच्या या टीकेला थेट उत्तर दिल आहे.
मुलाखतीत ठाकरे म्हणाले,”काँग्रेस काळात जसे मुसलमानाचे ‘इस्लाम खतरे मै है’ असे मोर्चे निघायचे तसे आता हिंदू जनआक्रोश मोर्चे निघू लागले आहेत. मग ९ वर्ष तुम्ही केलत काय ? आजही काश्मीरमध्ये पंडित खतरे मै है असं म्हंटल जातंय मग तुम्ही केलंत काय ? असा सवाल यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला होता. यानंतर आता भाजपने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट करत ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
“घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात. हिंमतवान लोकं समोरासमोर येऊन चर्चा करतात.” असा टोला लगावत भाजपने एक व्हिडीओ शेअर केला आहे. “घरात बसून मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या नेत्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत विक्टीम कार्ड खेळलं. पण, उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये. कारण, जनतेच्या मनातही अनेक प्रश्न सतावत आहेत. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाशी प्रतारण केली, तेव्हाच जनतेचा तुमच्यावरील विश्वास संपला,” अशी टीका व्हिडिओद्वारे करण्यात आली आहे.
घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात. हिंमतवान लोकं समोरासमोर येऊन चर्चा करतात.#UddhavThackrey #sattapipasu #maharashtragovernment pic.twitter.com/RDIKHbhpCb
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 27, 2023
उद्धव ठाकरे ज्या राहुल गांधींचे गोडवे गात आहेत ते वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांना शाब्दिक हल्ले चढवत आहेत आणि हिंदुत्वाचा अपमान करत आहेत. तसेच स्वतःच्या वडिलांचे विचार आणि भाजपसोबतचे नाते उद्धव ठाकरेंनी डावलले आहे.अशा प्रकारे निशाणे भाजपने पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे साधला आहे.