तळेगाव दाभाडे, {मनोहर दाभाडे} – इलेक्ट्राॅनिक साधने बाजारात उपलब्ध तर झालीच आहेत. पण इंटरनेट डाटाही स्वस्त मिळत असल्याने आणि इंटरनेटचा वेगही जास्त असल्याने शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे. आता पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची मुळीच गरज नाही.
मावळ तालुक्यातील अगदी दूधवाल्याकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाइन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. संसारोपयोगी महागाचे साहित्य, विविध साहित्यांपासून अगदीच दहा, वीस रुपयांना मिळणारी वस्तू, खाद्यपदार्थ विकत घ्यायचे असले, तरी क्यूआर कोड स्कॅन केला जात आहे.
रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण जेमतेम १० ते २० टक्के असून आता खिशात नव्हे, तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवा, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानुसार, ठराविक मुदत देऊन नागरिकांकडे असलेल्या ५०० आणि १००० च्या नोटा बँकामध्ये जमा करून घेण्यात आल्या आणि नंतर त्या चलनातून कायम बाद करण्यात आल्या. तेव्हापासूनच खऱ्या अर्थान ऑनलाइन व्यवहारास चालना मिळायला लागली. ऑनलाइन व्यवहाराला चालना देण्याची घोषणा शासनस्तरावरून करण्यात आली.
सुरुवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले असून सध्या रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने घटून डिजिटल पेमेंटला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करत असताना पुरेपूर खबरदारी बाळगायला हवी.
भाजीपाला विक्रेताही हायटेक
केवळ मोठे दुकानदारच नव्हे तर चक्क पाणीपुरी, समोसा अन् कचोरी विकणाऱ्यांनीही ग्राहकांच्या सोयीसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. यासह भाजीपाला विक्रेत्यांना ऑनलाइन पेमेंट ट्रान्सफरचा पर्याय खुला करून देण्यात आला आहे.
पाकीटमारी ऐवजी मोबाइल चोरी वाढली
ऐरव्ही आठवडे बाजारात किंवा बस प्रवासात गर्दीच्यावेळी नागरिकांची पाकिटे चोरीला जात असे. मात्र डिजिटल पेमेंट सुरू झाल्यानंतर पाकीटमारीच्या घटनांची नोंद होताना दिसत नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.