देऊळगाव राजे-माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संपर्कासाठी अनेक साधने उपलब्ध असताना देखील प्रत्यक्ष संकटाच्या काळात जवळपास असणाऱ्या व्यक्तींकडून तातडीने मदत मागणे आजच्या उपलब्ध साधनांद्वारे शक्य होत नाही. त्यासाठी नुकतीच ग्रामसुरक्षा यंत्रणा देऊळगावराजे येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना एखादी अनुचित घटना घडताना तिची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
या यंत्रणेमुळे घटनाग्रस्त नागरिकाला तातडीने मदत मिळणार आहे. गावातील घटना विनाविलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळणार आहे. त्यामुळे गावातील अफवांना आळा घालणे शक्य होणार आहे. प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणार आहे. पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य मिळणार आहे. संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात नागरिकांना मिळणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आपापले मोबाईल नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेत नोंदवून घ्यावे लागणार आहेत.
यावेळी माजी सरपंच अमित गिरमकर, सुरेश कुंभार, ग्राम सुरक्षा यंत्रणा संचालक डी. के. गोरडे, पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, पोलीस पाटील सचिन पोळ, रामचंद्र दुधाट, विष्णू सूर्यवंशी, दादा गिरमकर, महादेव औताडे, ग्रामसेवक मचिंद्र निगडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.