नवी दिल्ली : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३,१०९ कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती दिली.
यावेळी सभागृहास सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या सात वर्षांत सेटलमेंट्स आणि इतर उपायांमधून ५.४९ लाख कोटी रुपये वसूल केले असल्याचे सांगितले. दरम्यान, देशातील अनेक बँकांची हजारो कोटींची फसवणूक करून पळून गेलेले व्यावसायिक विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्याकडून १३ हजार १०९ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. या दोन फरार थकबाकीदारांच्या मालमत्ता विकून बँकांनी आतापर्यंत ही रक्कम वसूल केली आहे, असे त्या म्हणाल्या. या वसुलीची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी जुलैमध्येच दिली होती, मात्र आता अर्थमंत्र्यांनी ही अधिकृत माहिती संसदेत दिली आहे.
विजय मल्ल्या यांच्यावर अनेक बँकांचे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. याशिवाय हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांनी पीएनबीसह अनेक बँकांची १३,००० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.