मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना हा निकाल उद्याच लागणार आहे अशी माहिती समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल देण्याचे वक्तव्य सरन्यायाधीश यांनी केले आहे. दरम्यान, उद्याच्या निकालानंतर राज्यातील सरकार राहणार की कोसळणार हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, सुनावणीसंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही कायदेतज्ज्ञ 16 आमदार अपात्र ठरून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा करत आहेत. तर काही कायद्याचे जाणकार आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, असा दावा करत आहेत.
अश्यातच, शिंदे गटाकडून या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. “आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल..’ असा ठाम विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, ‘आधी निकाल येऊ दया मगच सर्वांनी आपलं ज्ञान पाजळावं. आज सर्व जण सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे’. असं ते यावेळी म्हणाले.