नवी दिल्ली : सध्या उत्तर प्रदेशमध्ये पुरामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यावरूनच भाजपाला घरचा आहेर देतानाचा कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. दरम्यान, बृजभूषण सिंह यांचा हाच व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे.
दरम्यान, ‘हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं’, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं. #UP तही अशीच स्थिती असून त्याचं वर्णन खुद्द भाजप खासदार पैलवान बृजभूषणसिंह यांच्याच तोंडून ऐका.@CMOMaharashtra pic.twitter.com/h43cnePzCw
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 15, 2022
“उत्तर प्रदेशातील पूरग्रस्त नागरिक देवाच्या भरवशावर बसले आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्याबाबतचं एवढं ढिसाळ नियोजन मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. पण लोकप्रतिनिधींचं तोंड बंद आहे. तोंड उघडलं तर त्यांना बंडखोर म्हटलं जाईल”, अशा शब्दांत बृजभूषण सिंह यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
“यापूर्वी राज्यात कुणाचंही सरकार असो, पूर येण्याआधी तयारीबाबत बैठका घेतल्या जायच्या. अलीकडे अशी कोणतीही बैठक घेतली असेल, असं मला वाटत नाही. पुराचं पाणी कधी आटेल आणि आमच्या अडचणी कधी कमी होतील, याची प्रतीक्षा लोक करत आहे” अशी सडकून टीका सिंह यांनी भाजपावर केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसाचा फटका पिकांना बसला आहे. पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला, द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.