मुंबई – अभिनेत्री मनवा नाईक आपल्या गुणी अभिनयासाठी ओळखली जाते. जाऊंद्याना बाळासाहेब असो किंवा पोरबाजार मनवाने सक्षमतेने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नुकतंच मनवाने तिला उबर कॅबच्या प्रवासादरम्यान आलेल्या अनुभव आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा अनुभव खरंच थरारक आहे. यावेळी मनवाने मुजोर चालकाचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
मनवा सांगते मी रात्री ८.१५ च्या दरम्यान उबेर बुक केली होती आणि एका ठिकाणाहून प्रवास करत होते. उबेरचा चालक मात्र सतत फोनवर बोलत होता असं मनवा म्हणते. थोडे दूर गेल्यावर त्याने थेट सिग्नल तोडला त्यावर मनवाने त्याला फोनवर बोलू नको आणि सिग्नल तोडू नको असं सांगितलं. पण त्या चालकाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे गेल्यावर पोलिसांनीच गाडी अडवली,त्या ड्रायव्हरने पोलिसांशी हुज्जत घालत मनवासोबत अरेरावीची भाषा केली.
काय म्हटलंय नेमकं मनवाने आपल्या पोस्टमध्ये
पुन्हा दोघांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर थेट चालकाने,थांब तुला दाखवतो म्हणत मनवालाच धमकावले,. मनवा म्हणते,मी त्याला गाडी पोलीस स्टेशनला घे, असं सांगितलं. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण प्रवासात त्याने माझ्याशी वाद घातला. गाडी भरधाव वेगाने चालवत असतानाव वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. काय करणार? थांब दाखवतोच आता, अशी धमकी त्याने मला दिली.
त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला.
हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती.
मी त्याला गाडी थांबव, असं सांगूनही त्याने माझं ऐकलं नाही.
त्याने कोणाला तरी फोन केला. ते पाहून मी जोरजोरात ओरडू लागले.
दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली.
मी आता सुरक्षित आहे परंतु या प्रसंगामुळे घाबरले आहे. दोन जणांनी केलेल्या मदतीमुळे मी वाचले असं देखील मनवाने आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे. मनवाने आपल्या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनसह महाराष्ट्र सीएमओ,विश्वास नांगरे पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील टॅग केले आहे.