फलटण -आषाढी वारीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, दि. 6 रोजी आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, मानाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख व मान्यवरांची व्हिडिओ कॉन्फरन्स होणार असल्याची माहिती आळंदी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन व अन्य निर्बंधांमुळे महाराष्ट्राचे अध्यात्मिक व सांस्कृतिक वैभव असलेल्या आषाढी वारीबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, राज्यातील मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास अवघे तीन आठवडे बाकी असल्याने या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (बुधवार) सकाळी 9 वाजता आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, मानाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख व मान्यवरांची व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. यामध्ये ऍड. ढगे-पाटील यांच्यासह विश्वस्त अभय टिळक, डॉ. अजित कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, योगेश देसाई, डॉ. नरेंद्र वैद्य, सोहळामालक आरफळकर प्रतिनिधी, शितोळे सरकार, चोपदार, वासकर महाराज, फडकरी संघाचे ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, दिंडी संघटनेचे अध्यक्ष मारुती महाराज कोकाटे सहभागी होणार आहेत.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यासह राज्यातील प्रमुख संतांच्या पालख्यांचे प्रस्थान दि. 12 जून रोजी, संत मुक्ताईंच्या पालखीचे दि. 27 मे तर संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान 6 जून रोजी होणार आहे. या सोहळ्याबाबत निर्णय झाल्यानंतर पूर्वतयारी करावी लागणार असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीतील निर्णयाकडे लागले.