सातारा – पृथ्वीवरचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. अवेळी पडणारा पाऊस, कधी पूर तर कधी दुष्काळ, शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च व कामगारांचा तुटवडा यामुळे शेती तोट्यात आहे. काळ्या आईचे दुःख कमी करण्याचे काम बांबू लागवडीतून होईल यासाठी बांबू लागवडीचा “सातारा पॅटर्न’ तयार करावा, असे आवाहन माजी आमदार, शेतकरी नेते व बांबू लागवड अभ्यासक पाशा पटेल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बांबू लागवडीच्या बैठकीच्या निमित्ताने पाशा पटेल आले होते. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केलेल्या विनंतीनंतर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आयोजित केलेल्या सरपंच, ग्रामसेवक यांच्या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पाशा पटेल म्हणाले, “”बांबू लागवड केल्यापासून तीन वर्षानंतर पुढील शंभर वर्ष उत्पादन मिळते. उत्पादन खर्च अत्यल्प आहे. बांबूच्या 16 हजारांपेक्षा जास्त प्रजाती असून बांबू व कळक यामध्ये फरक आहे. बांबूपासून बंगळुरूला विमानतळ केले आहे. त्यापासून घर, कपडे, स्लॅब, फरशी, पीओपी सर्व काही करता येते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिझेल वाहनांवर कालांतराने बंदी येणार असून कार्बन उत्सर्जन कमी करणे काळाची गरज आहे. यासाठी बांबूपासून इथेनॉल तयार करण्यात येणार आहे. दगडी कोळशासोबत 7 टक्के बायोमास म्हणून बांबूचा इंधन म्हणून वापर होणार आहे. देशात बांबूला फार मोठे मार्केट आहे. यासाठी शासनामार्फत तीन वर्षासाठी हेक्टरी सहा लाख 90 हजार इतके अनुदान दिले जात आहे.”
नागझरी येथे मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड केली असून पुढील मार्केटचे काय असा प्रश्न नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले यांनी उपस्थित केला होता. या अनुषंगाने पाशा पटेल यांनी मनोगत व्यक्त करत असताना थेट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना फोन लावला व बांबू प्रक्रिया उद्योगासाठी एक कोटी रुपयांचा निधी डीपीडीसीमधून द्यावा, असे आवाहन केले.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांशी बोलून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. या कार्यशाळेत पाशा पटेल यांनी आपल्या ग्रामीण बोली भाषेत बोलून उपस्थितांची मने जिंकली. ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, “”महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीसाठी सातारा व लातूर या जिल्ह्याची पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड झालेली आहे. सातारा जिल्ह्याला दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून सर्वांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.” कार्यशाळेस कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा कृषी अधिकारी विजय माईनकर, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उदयसिंह साळुंखे, किशोर माने यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.