जुन्नर(प्रतिनिधी) – कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून मे महिन्याच्या सुरुवातीला नियोजनानुसार पिंपळगाव जोगा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू होणार असल्याचे सूत्रानुसार समजत आहे. पिंपळगाव जोगा धरणात ९ टक्के (३५६ द.ल.घ.फु) पाणीसाठा शिल्लक असून डाव्या कालव्याचे आवर्तन शनिवार (दि. २) पासून सोडण्यात येणार असल्याचे समजत आहे.
तर बुधवारी (दि. २९) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी डाव्या कालव्यातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळाकरिता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन २० मे दरम्यान सोडण्याची मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी केलेली आहे. परंतु सद्य परिस्थितीत येडगाव धरणात केवळ ६.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून सदर पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाकरिता पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठा काढल्याशिवाय कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन पूर्ण करणे शक्य होणार नसल्याची चिन्हे आहेत.
डिंभे डाव्या कालव्यावरील पुलाला आधार देणारा मुख्य स्तंभ गुरुवारी (दि. ३०) कोसळल्यामुळे डिंभे धरणातून येडगाव धरणात येणाऱ्या पाण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून आर्वी गावाजवळील या पुलाची आणखी हाणी झाली तर येडगाव धरणात सुरू असलेला विसर्ग कधीही बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माणिकडोह धरणातून या कुकडी आवर्तनासाठी पाणी घेण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकार मंडळींचे मत आहे.
माणिकडोह धरणात केवळ ९.३४ टक्के (९५० द.ल.घ.फु) पाणीसाठा शिल्लक असून सदर शिल्लक साठा पाडळी, पिंपळगाव सिद्धनाथ, जुन्नर शहर, गोळेगाव, अमरापूर, हापुसबाग, कुमशेत, शिरोली या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याचे समजत आहे. त्यामुळे या धरणातून कुकडी आवर्तनासाठी पाणी येडगाव येथे सोडल्यास वरील गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान जुन्नरकरांसाठी शुक्रवारी (दि. १) दुपारी ६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. जुन्नर शहरासाठी कुकडी नदीवर साठवण बंधारा उभारण्यात आला आहे, मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटारी सुरू असल्यामुळे हे शहराचे पाणी जलदगतीने संपत असल्याचे दिसून येत आहे.