सुनीता शिंदे
कराड -सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरूवारी भरलेल्या जनावरांच्या बाजारास अत्पल्प प्रतिसाद मिळाला. जिल्हाबंदीमुळे फक्त स्थानिक लोकांनीच या बाजारासाठी उपस्थिती लावली. परिणामी जनावरांच्या खरेदी-विक्रीस फक्त दहा टक्केच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे काहींनी लगेच पळ काढला. बाजारासाठी आलेल्यांना नागरिकांना करोना महामारीचा हा परिणाम आहे. पुढील बाजार मात्र, याहीपेक्षा मोठा भरवला जाईल असे आश्वासन बाजार समितीच्या वतीने देण्यात येत होते.
कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेली अनेक वर्षे जनावरांचा बाजार भरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारांमध्ये कराडच्या जनावरांच्या बाजाराचा समावेश होतो. आठवड्यातून एकदाच हा बाजार भरवला जात असला तरीही लाखोची उलाढाल या बाजारातून होत असते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह पर राज्यातूनही विक्रेते येथे नेहमी हजेरी लावत असतात. जादाकरून पंढरपूर, सोलापूर, म्हसवड, वडूज, कोरेगाव, पाटण या भागातील लोकांचा समावेश असतो.
करोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. परिणामी सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व आस्थापने, बाजारपेठा बंद कराव्या लागल्या होत्या.
कराड येथील जनावरांचा बाजारही बंद ठेवण्यात आला होता. अडीच महिन्यांच्या कालावधीत अकरा आठवडी बाजार शेती उत्पन्न बाजार समितीला रद्द करावे लागले आहेत. या कालावधीत सुमारे अठरा लाखांचा तोटा बाजार समितीला सहन करावा लागला. गत चार दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता दिली आहे. गावोगावचे आठवडी बाजारही सुरू करण्यास सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरूवार, दि. 11 रोजी आठवडी बाजार भरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील विक्रेत्यांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक विक्रेत्यांनी या बाजारासाठी उपस्थिती लावली.
अनेक दिवसानंतर भरत असलेल्या या बाजारास चांगला प्रतिसाद मिळून बऱ्यापैकी उलाढाल होईल अशी अपेक्षा होती. मात्र, 150 विक्रेत्यांनी या बाजारासाठी उपस्थिती लावली. त्यामध्ये गाय, बैल, म्हैस, शेळी-मेंढ्या आदी प्रकारचे जनावरे घेऊन विक्रेते दाखल झाले होते. जनावरांच्या खरेदीस अत्पल्प प्रतिसाद मिळाल्याने अनेकांनी बाजारातून काढता पाय घेतला. अनेकांनी याबाबत शेती उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता करोनाचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊन संपताच पहिल्यासारखा बाजारास प्रतिसाद मिळेल. तोपर्यंत सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. तसेच पुढील बाजारास याहीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी बाजार समितीच्या वतीने प्रयत्न केला जाईल, अशीही ग्वाही देण्यात आली.
कराडचा जनावरांचा बाजार हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारांपैकी एक आहे. मात्र, करोनामुळे महाराष्ट्रात अजूनही जिल्हाबंदी आहे. त्यामुळे गुरूवारी भरलेल्या जनावरांच्या बाजारास अत्पल्प प्रतिसाद मिळाला आहे. लॉकडाऊन संपताच पूर्वीप्रमाणे बाजार भरला जाईल आणि यातून मोठी उलाढाल होईल.
बी. डी. निंबाळकर , सचिव, शेती उत्पन्न बाजार समिती