सातारा -“बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी वाचवा जीवन वाचवा, प्लॅस्टिक मुक्ती फायदा, हेल्मेट वापरा,व्यसन करू नका,’ असा प्रेरणादायी संदेश देत भारत भ्रमणासाठी निघालेले व लॉकडाऊनमुळे आसाममध्ये अडकलेले विकास शिंदे साडेआठ हजार किलोमीटर दुचाकीवरुन प्रवास करुन सुखरुप त्यांच्या गावी वाठार किरोली येथे पोहोचले.
या महाराष्ट्रीय पाहुण्याचा आसाममधील मोरीगाव येथील जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमुख स्वप्निल डेका यांनी 64 दिवस पाहुणचार केला. शिंदे यांच्या घरवापसीसाठी त्यांनी प्रयत्न केले. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील विकास जगन्नाथ शिंदे यांनी आजपर्यंत दुचाकीवरून सुमारे तीन लाख 45 हजार किलोमीटर प्रवास केला आहे. पाच वेळा भारतभ्रमण केले आहे. दि. 18 फेब्रुवारी रोजी शिंदे सहाव्यांदा दुचाकीवरुन भारतभ्रमण करण्यासाठी प्रारंभ केला. “बेटी बचाव बेटी पढाओ’चा संदेश देत त्यांनी प्रवास सुरू केला. भूतान देशात फक्त पाच किलोमीटर प्रवास करून करोनामुळे परत फिरावे लागले. अरूणाचल प्रदेशात जाऊन आसाममधील धेमाजी जिल्ह्यात ते पोहोचले असताना पुढील प्रवास करण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला.
या गंभीर परिस्थितीमध्ये पुढील प्रवास किंवा आपल्या गावी परतणे त्यांना अशक्य होते. लॉकडाऊनमुळे शिंदे यांच्यापुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शिंदे यांनी त्याठिकाणी कार्यरत असलेले जिल्हाधिकारी आणि लातूर जिल्ह्याचे सुपुत्र नरसिंग पवार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक फलटण तालुक्यातील कुरोली (माळेवाडी) गावचे सुपुत्र धनंजय घनवट या दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली. पवार आणि घनवट या दोन्ही अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत केली. घनवट यांनी मोरीगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्निल डेका यांना संपर्क साधून शिंदे यांची राहण्याची सोय करण्यास सांगितले. त्यानुसार डेका यांनी शिंदे यांची पोलीस विश्रामगृहात राहण्याची व जेवणाची सोय केली. तब्बल 64 दिवस या ठिकाणी मुक्कामास असताना सर्वांनी शिंदे यांना सहकार्य केले.
साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घनवट यांना फोन करून शिंदे यांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. भारतभ्रमण करताना खा. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांनी शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून त्यांची विचारपूस करुन त्यांना मदतही केली. अखिल सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक भुजबळ नियमित संपर्क साधून शिंदे यांना पुन्हा साताऱ्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. परतीचा प्रवास करतांना ऑनलाईन पास देण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मदत केल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले.
दुचाकीवरुन प्रवास करण्याचा खूप जुना छंद आहे. यावर्षी भारतभ्रमणासाठी बाहेर पडल्यानंतर लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. सुमारे अडीच महिने कुटुंबीयांपासून दूर राहावे लागले. मात्र, या अडचणीच्या काळात मला विविध क्षेत्रांतून मदत झाली. सचिन झिरपे, राजेंद्र बोबडे, राजेंद्र वाकडे यांनीही सहकार्य केले. प्रवासात छत्तीसगडच्या जंगलातून जात असताना तीन गुंडांनी त्रास दिला. मात्र त्या संकटातून बाहेर पडलो.
-विकास शिंदे (रायडर, वाठार किरोली)