पुणे – विद्यापीठ आवारात वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भाजीपाला आणि तत्सम जीवनावश्यक वस्तूंचा संचारबंदीमुळे निर्माण झालेला प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने सोडवला आहे. मुळशीतील शेतकऱ्यांशी संपर्क साधून भाजीपाला विद्यापीठात मागवण्यात आला असून, संचारबंदीचे नियम पाळून कर्मचारयांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी ही माहिती दिली.
करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता ठेवण्यात आली असली, तरी विद्यापीठाच्या आवारात राहणाऱ्या जवळपास साडेपाचशे ते सहाशे कुटुंबांना भाजीपाला कसा मिळणार हा प्रश्न होता. या पाश्र्वभूमीवर, विद्यापीठाच्या आवारातील अनिकेत कँटिन येथील दुकान खुले ठेवण्यात आले आहे, तसेच कात्रज दुध डेअरी सुरू ठेवण्यात आली आहे.
आरोग्याच्या दृृष्टीने आरोग्य केंद्रही २४ तास सुरू ठेवण्यात येत आहे. मात्र, भाजीपाल्याची उपलब्धता कशी होणार हा प्रश्न होता. विद्यापीठाकडून मुळशी येथील शेतकऱ्यांना थेट संपर्क साधून त्यांच्याकडून विद्यापीठातच भाजी मागवण्यात आली. त्यासाठी कुलगुरूसह सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून वर्गणी काढली आहे. चार दिवसातून एकदा भाजीपाला येणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांना विद्यापीठ आवाराच्या बाहेर जाण्याची गरज नाही. भाजीपाला खरेदी करण्यासाठीही नियम करण्यात आले असून, एका वेळी पाचच जणांना सहा फुटाचे अंतर राखून भाजीपाला दिला जात आहे, असे डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.