अरुण गोखले
आपल्या संस्कृतीचं आणि प्रामुख्याने खेडोपाड्यात ज्याचे हमखास दर्शन घडते असे एक सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व म्हणजेच वासुदेव.
पंचपंच उष:काल होत असताना, शीतल वारा वाहत असताना, पूर्वेला तांबडं फुटत असताना मुखाने देवाचे नाव घेत किंवा अलगद बासरीचे सुरेल सूर काढीत नाचत नाचत खेडोपाड्यात ही वासुदेवाची स्वारी येते. हा वासुदेव काय करीत येतो तर
पुण्याईच दान मागत सकाळच्या पारी।
गाव जागवीत येई, वासुदेवाची स्वारी।।
असा हा वासुदेव पहाटे पहाटे तुम्हाआम्हाला आपल्या अज्ञानाच्या झोपेतून जागवीत येतो. ज्ञानाची जागृती करीत आणि दानाचे पुण्यकर्म करून पुण्याईची शिदोरी जोडून घ्या रे, माझ्या मायबापांनो! हे सांगत आणि शिकवित येतो.
त्याच्या डोक्यावर मोरपीसांची टोपी, अंगातला पायघोळ अंगरखा, खाली विजार किंवा धोतर, कमरेला बांधलेलं उपरण, हातात तांब्याचे कडे, कपाळावर, गळ्यावर गंधाचे टिळे, गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या, नाहीतर तुळशीच्या माळा, हातात चिपळ्या टाळ, काखेला झोळी आणि मुखात भगवत नाम. हीच जणू काही त्याची ओळख असते.
त्याचं ते सात्विक दर्शन आपल्या मनात भक्तिभाव जागवून जाते आणि लगेच हाताला येईल ते पसाभर धान्य किंवा काही पैसे देऊन आपण त्या वासुदेवाला नमस्कार करतो, आशीर्वादाला नकळत त्याचा हात उंचावतो.
वासुदेवाचं वैशिष्ट म्हणजे त्याला दिलेल्या दानाची तो “”दान पावलं… दान पावलं रामाच्या नावानं दान पावलं…” अशी चोख पावतीही तुम्हाला न मागता अगदी हातोहात देत असतो. तो स्वत:हून कधीच कोणाकडे कधी काही मागत नाही. तर लोक आपणहून त्याच्या हातावर काहीतरी पैसे ठेवतात, त्याच्या झोळीत धान्य घालतात.
वासुदेव हे मुळातच श्रीकृष्ण भक्तीतून व्यक्त झालेलं आगळंवेगळं असं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्याच्या मुखी कृष्णलीलांचे वर्णन करणाऱ्या रचना जास्त असतात. मराठी संस्कृतीत वासुदेवांची परंपरा ही हजार-बाराशे वर्षे इतकी जुनी आहे. या वासुदेवाचा रुपकात्मक वापर अनेक संतांनी आपल्या साहित्यात केलेला आहे. संत एकनाथांच्या अशा काही रचना या नक्कीच वाचनीय आणि चिंतनीय आहेत.
वासुदेव ही जणूकाही समाज प्रबोधन करण्याची चालती बोलती शाळाच आहे. या दारोदार जाणाऱ्या आणि त्यास कोठेही जाण्यास प्रतिबंध नसणाऱ्या व्यक्तीचा ऐतिहासिक काळात हेरगिरी, खबर पोहोचविणे, गुप्त माहिती काढणे यासाठी मोठ्या कौशल्याने वापर केला गेला आहे.