प्रकृती गंभीर : कुटुंबीयांची केंद्र, राज्य सरकारकडे मागणी
पुणे – कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी आणि कवी वरवरा राव न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना लवकरात लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली आहे.
राव यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते. त्यावेळी राव यांच्या पत्नी पी. हेमलता, मुलगी पी. पवना, पी. अनाला, पी. सहजा उपस्थित होत्या.
यावेळी हेमलता म्हणाल्या, “वरवरा राव गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असून त्यांना कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहे. हे उपचार पुरेसे नसून त्यांची प्रकृती गंभीर आहे. दि. 28 मे रोजी त्यांची पहिल्यांदा तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना जे. जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, त्यांना पूर्ण बरे वाटत नसताना कारागृहात परत आणण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी. कारागृह हे राज्य शासनाच्या अख्यत्यारित येत असल्याने त्यांनी विशेष लक्ष घालावे.’