नवी दिल्ली :- केंद्र सरकारला वन्य प्राण्यांप्रती इतकेच प्रेम असेल, तर त्यांनी आफ्रिकेतून चित्ते भारतात आणून त्यांना मारण्यापेक्षा, भारतातून नाहिशा होत असलेल्या नैसर्गिक प्रजातींच्या संवर्धनासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. वेगळ्या वातावरणात राहणाऱ्या चित्त्यांना भारतीय वातावरणात आणणे म्हणजे क्रूरताच आहे, अशा शब्दांत भाजप खासदार वरुण गांधी यांनी केंद्र सरकारच्या “प्रोजेक्ट चित्ता-2′ मोहिमेवर टीका केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आयात करणे आणि त्यातील नऊ जणांना एका वेगळ्या वातावरणात मरण्यासाठी सोडणे म्हणजे केवळ निष्काळजीपणा आणि उदासीनता नसून पर्यावरणाच्या भाषेत ही चक्क क्रूरता आहे, असेही गांधी म्हणाले.
“प्रोजेक्ट चित्ता’चे प्रमुख एसपी यादव यांनी शनिवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, चित्त्यांचा पुढील गट दक्षिण आफ्रिकेतून आणून मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात सोडला जाणार आहे.
वरुण गांधी पक्षाला घरचा आहेर देताना म्हणाले की, या सुंदर आणि अतीवेगवान प्राण्यांचे दुःख वाढवण्याऐवजी आपण आपल्या लुप्त होत चाललेल्या प्रजाती आणि आधीच अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विदेशी प्राण्यांची ओळख करून देण्याचा हे बेपर्वा कृत्य त्वरित थांबवले पाहिजे आणि त्याऐवजी आपण आपल्या मूळ वन्यजीवांच्या कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे.
दरम्यान, आणखी चित्ते आणण्याच्या घोषणेचा खरपूस समाचार घेत कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, नामिबियातून चित्ते आणण्याच्या अत्यंत अयशस्वी प्रकल्पानंतर (9 आधीच मरण पावले आहेत), आता दक्षिण आफ्रिकेतील चित्ते मरण्यासाठी भारतात आणले जाणार आहेत का?
देशातील चित्ता नामशेष झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भारताच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम “प्रोजेक्ट चित्ता’ला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्त्यांच्या गटाला सोडले तेव्हा या उपक्रमाची सुरुवात झाली.