चीनच्या धोक्याची पूर्वसूचना देणारे लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील-थोरात यांचे आज पुण्यस्मरण (निधन 10 ऑगस्ट 1992). त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1906 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव (ता. शाहूवाडी), येथे झाला.
वडगाव हे छोटे गाव कोल्हापूरच्या दुर्गम पश्चिम भागात ऐतिहासिक विशालगड परिसरात असून शिवरायांच्या पराक्रमाची पार्श्वभूमी या परिसराला आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी सॅंडहर्स्ट रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व रॉयल इंडियन आर्मीमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून भरती झाले. लष्करीपेशा पत्करलेले थोरात शास्त्रीय संगीताचेही चाहते होते.
लष्करीबाणा पूर्णपणे भिनलेल्या थोरात यांनी ब्रिटिश लष्करात आपली सेवा चोख बजावली. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात आपली शासनाशी एकनिष्ठाही तेवढीच जपली. वर्ष 1926 मध्ये ते सेकंड लेफ्टनंट झाले. त्यानंतर वर्ष 1928 मध्ये लेफ्टनंट, वर्ष 1935 मध्ये कॅप्टन, वर्ष 1940 मध्ये मेजर, वर्ष 1941 मध्ये काही काळ क्वेटा येथील लष्करी अधिकाऱ्यांच्या कॉलेजमधेही काम केले. वर्ष एप्रिल 1946 मध्ये कर्नल, त्याच वर्षी जूनमध्ये ब्रिगेडियर, तर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे मेजर जनरल झाले.
दुसऱ्या महायुद्धात कर्नलपदी असणारे थोरात यांनी पंजाब रेजिमेंटचे पहिले भारतीय कमांडर म्हणून धुरा सांभाळलेली होती. त्यावेळी लेफ्टनंट कर्नल म्हणून त्यांनी म्यानमारमधील जपानविरुद्धच्या मोहिमेत मोठी कामगिरी बजावली. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात युनोच्या शांतिसेनेत भारताने कोरियन युद्धाचे वेळी आपले सैन्य पाठविले होते. त्यावेळी रिपब्लिक ऑफ कोरियाच्या अध्यक्षांनी भारतीय सैन्याच्या उपस्थितीस आक्षेप घेतला होता. त्यामुळे मोठी अडचणीची परिस्थितीही निर्माण झाली होती.
त्यांच्यावर यावेळी मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. यावेळी सर्व जगाचे लक्ष या कारवाईने वेधून घेतले होते. त्यावेळी त्यांनी कैद्यांचे देवाण-घेवाण प्रसंगी चिनी सैन्याचा उपोषण सत्याग्रह अतिशय चातुर्याने मिटविला होता. जीव धोक्यात असतानाही ते आपल्या सहकाऱ्यांचे बरोबर कैद्यांच्या कॅम्पमध्ये गेले व आपल्या चतुर संभाषणाने समजूत काढली. त्यांनी 1957 मध्ये लष्कराच्या पूर्वविभागाचे लष्कर प्रमुख म्हणून कारभार स्वीकारला.
हा त्यांच्या सेवेतील सर्वोच्च बहुमान होता. त्यावेळी पूर्वविभागाचे मुख्यालय लखनौ येथे होते. वर्ष 1959 मध्ये नेफामधील (आताचे अरुणाचल) लोंगचू येथील घटनेनंतर त्यांना चीनच्या भविष्यातील आक्रमणाचा अंदाज आला. त्यांनी लगेचच विस्तृत अहवाल तयार करून सीमेपर्यंत रस्ते बांधणीची आवश्यकता असल्याचे नमूद केले. दुर्दैवाने हा अहवाल तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी विचारात घेतला नाही.
केवळ थोरात यांच्या प्रयत्नामुळेच “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ ही लष्करी प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात खडकवासला येथे आणली. तिचा संपूर्ण आराखडा व अंमलबजावणी थोरातांनीच केली आहे. तिन्ही सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीची ही संस्था जणू त्यांचे स्मारकच आहे.
त्यांना कीर्तीचक्र, पद्मश्री, डी.एस.ओ., अशोकचक्र अशा किताबांनी गौरविण्यात आले होते. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना “झुंजारराव’ हा किताब व मानाची समशेर अर्पण केली होती. त्यांचे चिरंजीव डॉ. यशवंत थोरात लवकरच शंकरराव थोरात यांचे “माझी शिपाईगिरी’ आत्मचरित्र लवकरच पुन्हा प्रकाशित करणार आहेत.