मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल जेमतेम लागलाच होता; तोच भाजपने 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे काम काही नेत्यांच्या खांद्यावर सोपविले होते. जसे, भाजपचे उमेदवार ज्या मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आले होते त्या मतदारसंघात फोकस करण्याचे काम काही नेत्यांना देण्यात आलं होते. 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तेव्हाच 2017 मध्ये यूपीत होणाऱ्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली होती.
आता, यूपी आणि पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त भाजपने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याची कुजबूज कानावर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच वायएसआर कॉंग्रेसचे खासदार मिथून रेड्डी यांना भेटीसाठी बोलाविले होते.
मिथून रेड्डी यांचा आदरातिथ्य सोपस्कार पार पाडल्यानंतर गृहमंत्री शहा यांनी मूळ मुद्द्याला हात घातला. गृहमंत्र्यांनी इकडच्या तिकडच्या गोष्टीत वेळ वाया न घालविता मिथून रेड्डी यांना थेट एक प्रश्न विचारला.
“क्या आपकी पार्टी राष्ट्रपती चुनाव में एनडीए उमेदवार का समर्थन करेगी?’ हा प्रश्न ऐकून रेड्डी सुरुवातीला गोंधळल्यासारखे झाले. पण नंतर म्हणाले की, “भाजपकडे आधीच पूर्ण बहुमताचा आकडा आहे. मग आमची गरज पडण्याचा प्रश्नच कुठे येतो?’ तर, गृहमंत्री म्हणाले, “कदाचित पडूही शकते.’ उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, आसाम या राज्यांमध्ये निवडणुका होणे आहे. निकाल काय लागेल? सांगता येत नाही. म्हणून कदाचित गरज पडू शकते.
यानंतर रेड्डी यांनी गृहमंत्र्यांना सांगितले की, भाजपची भावना पार्टी प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या कानावर लगेच घातली जाईल. तसं बघितलं तर, भाजपला आमची गरज पडणार नाही. परंतु, पडलीच तर यात कोणता अडथळा येईल असे वाटत नाही, असेही रेड्डी यावेळी म्हणाले. म्हणजे केंद्राशिवाय 17 पेक्षा जास्त राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. 2024 मध्ये सशक्त प्रतिद्वंद्वी दिसत नाही. तरीसुद्धा, दूरची तयारी आहे आणि सहा महिन्यांनंतर काय करायचं? हा प्रश्न विचारला तर विरोधी पक्षांना सुचेनासे होते!
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस सक्रिय झाली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी लखनौमधून आपली सायकल यात्रा सुरू केली आहे. इंधन दरवाढ, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, कृषी कायदे आणि तुरुंगात बंद सपा नेते आझम खान यांची मुक्तता त्यांच्या सायकल मार्चचे प्रमुख मुद्दे आहेत. अखिलेश यादव यांच्यात उत्साह संचारला आहे. “येत्या निवडणुकीत सपाचे 350 आमदार निवडून येतील, असं वाटत होतं. मात्र, लोकांमध्ये भाजप सरकारविरुद्धचा राग पाहता सपा 400 जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही’, असे विधान यादव यांनी केले आहे. हा सायकल मार्च प्रत्येक जिल्ह्यातून 5-10 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
सपा ऑक्टोबरमध्ये 75 जिल्ह्यांतून रथ यात्रा काढणार आहे. या कामात सपा भाजप, बसपा आणि कॉंग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. रालोद आणि पीस पार्टी यासारख्या लहान पक्षांसोबत आघाडी होण्याची चर्चा आहे. राजद नेता लालूप्रसाद यादव यांनी चिराग पासवान यांच्याशी हातमिळवणी करण्याची अनुकूलता दर्शविली आहे.
दुसरीकडे, यूपीतील दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसने तीन ऑगस्ट रोजी “दलित स्वाभिमान दिवस’ साजरा केला. यूपीत कॉंग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. राज्याच्या राजकारणात मोलाची भूमिका निभावणाऱ्या जातींचे संमेलन आधीच आयोजित करण्यात आलं आहे. कॉंग्रेसनं आतापर्यंत निषाद-केवट-मल्लाह संमेलन, मौर्य-शाक्य-सैनी-कुशवाहा संमेलन आणि पाल-गडेरिया-धनगर समाजाचे संमेलन आयोजित केले आहे.
राजकीय विश्लेषकांनुसार, 2022 च्या निवडणुकीत दलित मतदार निर्णायक भूमिका निभावणार आहेत. कदाचित म्हणूनच, सर्वच पक्षांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. कॉंग्रेस नेत्या आणि यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधी-वढेरा यांनी आघाडीसाठी पक्षाचे दार खुले असल्याचे सांगितले आहे. मात्र, काही नेत्यांच्या मते कॉंग्रेसने यूपीची निवडणूक ही स्वबळावर लढविली पाहिजे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या लाख विरोधानंतर कॉंग्रेसने नवज्योतसिंग यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. ते राहुल गांधी यांच्या निकटचे मानले जातात. याशिवाय, आसामच्या प्रदेशाध्यक्षपदी भूपेनकुमार बोरा आणि केरळच्या प्रदेशाध्यक्षपदी के. सुधाकरन यांची निवड करण्यात आली आहे. ही मंडळी राहुल गांधी यांच्या जवळची मानली जातात.
महत्त्वाचा मुद्दा असा की, भूपेनकुमार बोरा हे विधानसभा किंवा संसदेच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. ते आतापर्यंत तीन निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत. यात विधानसभेच्या दोन आणि लोकसभेची एक निवडणूक सामील आहे. यावरून हे सिद्ध होते की राहुल गांधी यांचा त्यांच्यावर किती विश्वास आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला आणखी एका वर्षाचा कालावधी बाकी आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते वेळ वाया घालविण्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यासाठी भाजप आतापासूनच चाचपणी करीत आहे.