– माधव विद्वांस
कवी, कादंबरीकार, शेतकरी, सामाजिक विचारवंत, नाटककार र. वा. दिघे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म कल्याण येथे 24 एप्रिल 1896 रोजी झाला. काही ठिकाणी 25 मार्च असाही उल्लेख आहे. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने सतत बदली व्हायची, त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण कर्जत, खोपोली, जळगाव, चाळीसगाव, सोलापूर, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. वर्ष 1922 मध्ये ते बी.ए., तर वर्ष 1925 एलएलबी झाले. त्यानंतर पनवेल येथे अल्पकाळ वकिली केली व पुणे येथे आले. पुणे येथे फौजदारी कोर्टात त्यांनी वकिली केली. त्यांना शिकारीचा नाद होता.
एकदा शिकारीनंतर दमल्यामुळे त्यांना झोप लागली. त्यानंतर एक दुर्घटना घडली व त्यातच त्यांची लाडकी कन्या उल्हास हिचा अंत झाला. या घटनेचा त्यांच्या मनावर परिणाम झाला व ते पुणे सोडून खोपोली येथे राहण्यास आले. दुःख विसरण्यासाठी त्यांनी लेखन सुरू केले व “पाणकळा’ ही पहिली कादंबरी पूर्ण केली. ग्रामीण कथानक असल्याने प्रकाशक मिळेना, शेवटी त्यांनी स्वतःच मुलीच्या नावाने उल्हास प्रकाशनमार्फत ही कादंबरी प्रकाशित केली. त्यांच्या या कादंबरीतून तिथल्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या भिल्लांच्या कथेमधून पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथावेदना त्यांनी मांडल्या आहेत.
ते स्वत:च बांधावरचे शेतकरी असल्याने त्यांची नाळ मातीशी जोडलेली होती. त्यांनी कोकणात न पिकणारा गहू आपल्या शेतात पिकवून दाखवला.त्याबद्दल खालापूर तालुका विकास संघाने प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा गौरव केला. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण वाचतो. पण शेतकऱ्यांचे कळीचे प्रश्न त्यांनी त्यांच्या लेखनातून मांडताना त्यांनी 80 वर्षांपूर्वी हे भाकीत केले होते. शेतकऱ्यांनी नुसत्या शेतीवर अवलंबून राहाणे उपयोगी नाही, काहीतरी जोडधंदा करावा. “पाणी अडवा-पाणी जिरवा’ हा विचारही त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून त्याकाळीच मांडला होता. त्यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या कादंबरीतील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. “पाणकळा’ आणि “पड रे पाण्या’ या त्यांच्या दोन कादंबऱ्यांतून भीमा नदीच्या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे जीवन दर्शविले आहे.
“आई आहे शेतात’ या कादंबरीत शेतकऱ्यांचे खडतर जीवनाचे सत्य त्यांनी वाचकांपुढे आणले आहे. शेती ही फुकाची नाही. गप्पा मारून वा शिरा ताणून शेती होत नाही तसेच जमीनवाटप करून वा कायदे करून हा प्रश्न सुटणारा नाही. यासाठी शेतीचे ज्ञान असणाऱ्यांच्या हातात जमीन असायला पाहिजे, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. दिघे यांच्या लेखनाला सामाजिक प्रश्नांचाही स्पर्श आहे. त्यांची “कार्तिकी’ ही कादंबरी अस्पृश्यता निवारण या विषयावर आहे. त्यावर पुढे “कार्तिकी’ नावाचा चित्रपटही निघाला. लेखनासाठी त्यांनी खूप भटकंती केली. “सोनकी’ ही कादंबरी लिहिण्याआधी गोंडवनात जाऊन त्यांनी तिथले आदिवासी जीवन व तो परिसर जवळून न्याहाळला. त्यामुळे लेखनाला निसर्गाचा गंध आहे. यानंतर त्यांच्या “निसर्गकन्या रानजाई’ व “गानलुब्धा मृगनयना’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. 4 जुलै 1980 रोजी त्यांचं निधन झालं.