माधव विद्वांस
प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांची आज जयंती. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील बाबूपट्टी या गावात झाला. त्यांचे खरे नाव हरिवंशराय प्रताप श्रीवास्तव. त्यांना त्यांच्या लहानपणी कौतुकाने सर्वजण बच्चन (बच्चा) म्हणत आणि पुढे याच नावाने त्यांनी लेखनही केले.
चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ते वडील. हरिवंशराय यांचे आरंभीचे शिक्षण उर्दूतून झाले. घरची गरिबी त्यामुळे शिक्षणात खूप अडथळे आले, तरीही 1929 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून ते पहिल्या वर्गात बी.ए. उत्तीर्ण झाले.
बच्चन यांचे “मधुशाला’ (1935), “मधुबाला’ (1936) “मधुकलश’ (1937) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आणि ते प्रकाशझोतात आले. हिंदी काव्यातील “हालावादा’चा प्रवाह सुरू झाला. (हालावादा म्हणजे प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी कराव्या लागलेल्या झगड्याचे वर्णन) ते हालावादी बनण्याचे मुख्य कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आलेले अनेक कटू प्रसंग. पहिल्या पत्नीचा झालेला मृत्यू, यासारखी कारणे त्यामागे आहेत.
या अडचणीच्या काळात असतानाच एडवर्ड फिट्सजेरल्ड यांनी अनुवादिलेल्या 11वे शतकातील उमर खय्याम यांच्या रूबायांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. हालावाद भौतिक सुखवादाचा, मदिरा व मदिराक्षी यांच्या कैफात प्राप्तकाल जगण्याचा, निदर्शक आहे. ईश्वर, पुनर्जन्म, कर्मवाद, आध्यात्मिकता, पाप आणि पुण्य या सर्व विचारसरणीस बच्चन यांनी आव्हान दिले. 1938 मध्ये एम.ए. व 1939 मध्ये बनारस येथून ते बी.टी. झाले.
1942 पासून अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. वर्ष 1945 मध्ये डब्ल्यू. बी. येट्स या प्रसिद्ध आयरिश कवीवर “डब्ल्यू. बी. येट्स अँड ऑकल्टिझम’ हा प्रबंध लिहून त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. मिळविली.
हा प्रबंध पुढे वर्ष 1965 मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. वर्ष 1955 मध्ये अलाहाबाद आकाशवाणीवर हिंदी विभागाचे निर्माता म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे वर्षभर काम केल्यावर भारत सरकारच्या विदेश मंत्रालयात विशेष अधिकारी या नात्यानेही त्यांनी काम केले.
वर्ष 1966 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांच्या “चौंसठ रूसी कविताएँ’ या संग्रहास सोव्हियत लॅंड नेहरू पुरस्कार, तसेच हिंदी साहित्य संमेलनाकडून 1968 मध्ये “साहित्य वाचस्पती’ ही सन्मान्य उपाधी देण्यात आली. वर्ष 1968 मध्ये “दो चट्टाने’ काव्यास साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला.
वर्ष 1970 मध्ये फ्रो-आशियाई लेखक परिषदेकडून “लोटस पुरस्कार’ तसेच अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. तत्कालीन दुर्बोध, अतिअंतर्मुख व अमूर्त हिंदी कवितेला कंटाळलेल्या वाचकांना व श्रोत्यांना त्यांनी आपल्या सरळ, सुबोध, सुरस काव्यरचनेने आणि विशेषतः व्यासपीठावरून केलेल्या काव्यगायनाने हजारो रसिकांची माने जिंकली.
त्यांनी प्रचलित व्यावहारिक भाषेतील काव्याची रचना करून देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या कवितेवर उर्दू शब्दकळा व लकबी यांचा खुबीदार संगम दिसून येतो. “क्या भूलूँ क्या याद करूँ?’ या त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे पहिले तीन भाग प्रकाशित झाले आहेत. हिंदीतील आत्मचरित्र प्रकारात बच्चन यांनी अतिशय मोलाची भर घातली आहे.
भगवद्गीतेचाही त्यांनी तुलसी रामायणाच्या धर्तीवर दोहाचौपाई छंदात जनगीता नावाने हिंदी अनुवाद केला. अखेरचे आयुष्य त्यांनी मुंबई येथे आपले चिरंजीव अमिताभ बच्चन यांच्याकडे घालविले. 18 जानेवारी 2003 मध्ये मुंबई येथे त्यांचे निधन झाले.