माधव विद्वांस
भारतात गोवा सामील झाल्यानंतर गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री, एक उद्योगपती व दानशूर म्हणून प्रसिद्ध, भाऊसाहेब तथा दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म गोव्यातील पेडणे येथे 12 मार्च 1911 रोजी झाला. वडिलांचे नाव बाळकृष्ण व आईचे श्रीमती. त्यांच्या लहानपणीच त्यांचे मातृपितृछत्र हरपले. त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे झाले. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही त्यांनी आत्मसात केल्या होत्या.
आवश्यक शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे यशस्वी खाणमालक म्हणून नावलौकिक व धनदौलत मिळविली. व्यवसायाने खाणमालक असलेल्या भाऊसाहेबांनी आपल्या खाणीवर काम करणाऱ्या मजुरांपासून ते मॅनेजरपर्यंत सर्व थरातील, कामगारांचे हित जपले होते. कामगारांच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबांचे आरोग्य या बाबतीत ते जागरूक होते. खाणींची माती शेतात जाऊन शेतांची नासाडी होऊ नये यासाठी ते सदैव जागरूक असायचे. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली त्यामुळे ते दानशूर म्हणून ओळखले जायचे. त्यांचा विवाह सुशीलाबाई पेडणेकर यांच्याशी झाला. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीचे बांदोडकर वर्ष 1942 च्या छोडो भारत आंदोलनातही सामील झाले होते. त्यातूनच तरूणवर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला; त्यामुळे त्यांना 1956 साली तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला होता. 11 डिसेंबर 1962 रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केले. गोवा महाष्ट्रात विलीन करावा, या मताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते त्यामुळे त्यांनी वर्ष 1963 मध्ये स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. संपूर्ण गोव्यामध्ये खेड्यापासून शहरापर्यंत त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे विणलेले होते. गोव्याला लोकनियुक्त सरकार मिळावे म्हणून 9 डिसेंबर 1963 रोजी गोव्यात निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण 30 पैकी 14 जागा मिळवित त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा पराभव केला व तीन अपक्षांच्या मदतीने राजभवनावर 20 डिसेंबरला सकाळी 10 वाजता पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. मात्र यावेळी बांदोडकरांनी निवडणूक लढविली नव्हती.
सुंदर सागर किनारा व विपुल वनश्री असे निसर्गाचे वरदान मिळालेल्या गोव्यामध्ये पर्यटनास चालना देण्याचे धोरण त्यांनी अवलंबिले. त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत गोव्यात अनेक सुधारणा झाल्या. गोव्याचे सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले. शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले; उद्योजकांना चालना दिली, ग्रामीण शिक्षणाबरोबर त्यांनी तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला.साहित्य-कला क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली; क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. 12 ऑगस्ट 1973 रोजी त्यांचे निधन झाले.