माधव विद्वांस
विद्रोही, आंबेडकरवादी लेखक, कवी बाबुराव बागूल यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 17 जुलै 1930 रोजी नाशिक जिल्ह्यातील विहितगाव या खेडेगावात झाला. जातीय विषमतेचे अनुभव दलित जातीत जन्मल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच अनुभवले होते.
बाबुरावांची आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा हे तरी अपत्य जगावे या विचाराने त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅम्पात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्यांच्या जन्माच्या अगोदरपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी बहुजन समाज जागृत होऊ लागला होता. त्यातच मुंबईमध्ये पोटापाण्यासाठी मोठ्या संख्येने आलेला समाज आंबेडकरांच्या विचाराने एकत्र येऊ लागला होता. साहजिकच शालेय जीवनापासून या वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता.
त्यामुळे चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. त्यांच्यात कवी व लेखक असल्याची चुणूक दाखवून दिली. आर्थिक अडचणीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असताना मुंबईत वाढत असलेल्या कामगार चळवळीचा त्यांच्यावरही प्रभाव पडला. त्यांनी साम्यवादी साहित्याचा अभ्यास केला. त्यांनी रचलेल्या कवितांमधून बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध विचार उमटू लागले.
ते राहत असलेल्या माटुंग्याच्या लेबर कॅम्पातच अण्णा भाऊ साठे राहत असत. त्यांच्या संपर्कात येऊन ते कामगार चळवळीत सहभागी झाले. वर्ष 1955 मध्ये रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी मिळाल्यामुळे ते सुरतेस गेले. त्यांना तेथे राहण्यासाठी जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी आपली जात दडवून भाड्याचे घर घेतले. परंतु जात दडवून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी “जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली.
समाजातील कारूण्य आणि अनुभवलेल्या क्रुरतेचे जिवंत प्रसंगचित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, पदपथावरील जीवनाचे भेदक चित्रण त्यांनी त्यांच्या लेखनातून केले. वर्ष 1957 मध्ये त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या “नवयुग’ नियतकालिकातून प्रथमच प्रकाशित झाली. त्यानंतर “नवयुग’ व “युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. वर्षानुवर्षे चालत असलेल्या समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा 1963 साली “जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. वर्ष 1969 मध्ये “मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.
“अघोरी’, “कोंडी’, “पावशा’, “सरदार’, “भूमिहीन’, “मूकनायक’, “अपूर्वा’ अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात शोषितांचे प्रश्न मांडणारा प्रवाह सुरू झाला. त्यांचे लेखन बहुजन समाजातील लेखकांना दीपस्तंभासारखे ठरले. बहुजन समाजातील स्त्रियांवर सर्वसाधारण समाजाबरोबर घरातही पुरुषप्रधान कुटुंबपद्धतीमध्येही गौण स्थान होते. त्यामुळे बहुजन स्त्रिया दुहेरी अन्याय सहन करीत होत्या. त्यांच्या “सूड’ या कथेमध्ये वाडीवस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं हृदयविदारक चित्रण केले आहे.
महाराष्ट्र बौद्ध साहित्यसभेने महाड येथे आयोजित केलेल्या “दलित साहित्य संमेलन’ तसेच वर्ष 1999 मध्ये भरलेल्या पहिल्या “विद्रोही साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांना हरि नारायण आपटे पारितोषिक आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मिळाला. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा “जनस्थान पुरस्कार’ वर्ष 2007 मध्ये त्यांना देण्यात आला. 26 मार्च 2008 रोजी बागुलांचे नाशिक येथे निधन झाले. अभिवादन.