– माधव विद्वांस
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, गांधीवादी भाष्यकार, तत्त्वचिंतक, आध्यात्मिक वृत्तीचे प्रज्ञावंत लेखक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे 26 सप्टेंबर 1894 रोजी झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामधून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन 1917 साली बी.ए. झाले.
महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीसाठी त्यांनी एमएचा अभ्यास अर्धवट सोडला व वर्ष 1920 मध्ये आंदोलनात सामील झाले. लोकमान्य टिळकांच्या नंतर गांधीयुग सुरू झाले होते. त्याच सुमारास रशियामध्ये क्रांती होऊन मार्क्सवादी साम्यवादी राजवट सुरू झाली होती. त्यावेळी त्यांनी गांधीवाद व मार्क्सवाद यांचा तौलनिक अभ्यास चालूच ठेवला होता.
जेव्हा त्यांनी राजकारणात पदार्पण केले, तेव्हापासून 1937 सालापर्यंत टिळकसंप्रदाय व गांधीसंप्रदाय यांच्यात वैचारिक संघर्ष चालू होता. जावडेकर गांधीवादी असले, तरी त्यांनी आपल्या समन्वयी वृत्तीला अनुसरून टिळकांच्या राजकारणाचा खराखुरा वारसा गांधींच्याच वाट्यास आला आहे, असे प्रतिपादन केले होते. त्यांचा राजनीतिशास्त्र परिचय हा ग्रंथ 1926 साली प्रसिद्ध झाला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये वर्ष 1930 मधे सहा महिने, 1932-33 साली पावणेदोन वर्षे, 1942 च्या लढ्यात अडीच वर्षे कारागृहवास भोगला.
कारागृहातच त्यांनी मार्क्सचा कॅपिटल, लास्कीचा अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स इत्यादी ग्रंथांचा अभ्यास केला. त्याच वर्षी त्यांची पुणे येथे टिळक महाविद्यालयामध्ये इतिहास, अर्थशास्त्र आणि राजकारण हे विषय शिकविण्याकरिता नेमणूक झाली आणि ते “आचार्य’ म्हणून संबोधले जाऊ लागले. काही काळासाठी स्वराज्य, नवशक्ती, लोकशक्ती या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम पाहिले. त्यांनी 1919 ते 1955 या कालावधीत लोकशिक्षण, नवभारत, साधना, अखंड भारत या मासिकांतून भरपूर लेखन केले.
वर्ष 1950 ते 1955 पर्यंत रावसाहेब पटवर्धनांबरोबर आचार्य जावडेकर यांनी “साधना’ साप्ताहिकाच्या संपादकपदाची धुरा वाहिली. या लेखनात जागतिक सामाजिक व राजकीय चळवळींचा उहापोह केला असल्याने त्यातून अनेक राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व स्फूर्ती लाभली. वर्ष 1947 पर्यंत ते कॉंग्रेसचे सभासद होते. त्यानंतर त्यांनी प्रजासमाजवादी पक्षास वाहून घेतले. त्यांनी गांधीवाद, मार्क्सवाद व इतर राजकीय व सामाजिक विषय यांवर विवेचनात्मक अनेक ग्रंथ लिहिले.
जावडेकरांच्या ग्रंथसंपदेतील आधुनिक भारत हा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात पेशवाईच्या अस्तापासून गांधीयुग स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत भारतात विशेषतः महाराष्ट्रात ज्या वैचारिक चळवळी झाल्या, त्यांचे संपूर्ण समालोचन वाचण्यास मिळते. तसेच स्वतंत्र भारताची रचना कोणत्या पद्धतीने व्हावी याची तात्त्विक रूपरेषा त्यांनी या ग्रंथात दिली आहे. आचार्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला असल्याने या ग्रंथात त्याचा प्रभाव दिसून येतो.
त्यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षाची उत्क्रांती, हिंदी राजकारणाचे स्वरूप, विश्वकुटुंबवाद, राज्यशास्त्र मीमांसा, गांधीवाद, कॉंग्रेस आणि महायुद्ध, लोकमान्य टिळक व गांधी, गांधी जीवनरहस्य हे ग्रंथ लिहिले. वर्ष 1949 मध्ये पुणे येथे महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांचे राजकीय लिखाणही सध्याच्या राजकीय वक्त्यांना अतिशय मार्गदर्शक असून टीका कशी करावी याचा अर्थबोध नक्कीच होईल. त्यांनी आपले अखेरचे आयुष्य इस्लामपूर येथे व्यतीत केले. इस्लामपूरला त्यांनी दलितांकरीता एक शाळा चालविली होती.
ते अजातशत्रू होते. अनेक पक्षांचे कार्येकर्ते त्यांच्याकडे सल्ला व मार्गदर्शन यांकरिता इस्लामपूरला जात असत. 10 डिसेंबर 1955 रोजी इस्लामपूर येथे त्यांचे निधन झाले.