…तर पंतप्रधानपदही गमावण्याची तयारी
कोचीन, दि.25 – घटनेत नमूद केल्याप्रमाणे मी संबंध देशात दारूबंदी जारी करणार आहे. मग त्यापायी मला माझं पंतप्रधानपद सोडावे लागले तरी बेहत्तर. तसे घडल्यास मला त्यात अभिमानच वाटेल, असे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सांगितले. दारूबंदीचा प्रयोग आतापर्यंत फसला आहे.
दारूबंदीमुळे बेकायदा दारू उत्पादनास उत्तेजन मिळेल व बेकारीत भर पडेल, असा युक्तिवाद मजपुढे केला जातो, परंतु ते म्हणणे मान्य नाही. देसाई पुढे म्हणाले की, आपला देश गरीब लोकांचा आहे. 60 टक्के गरीब आहेत. त्यांची परिस्थिती संपूर्ण दारूबंदी झाल्याशिवाय कधीच सुधारणार नाही.
आणीबाणी कलम दुरुस्त स्वरूपात कायम
नवी दिल्ली – आणीबाणी पुकारण्याचा अधिकार सरकारला देणारे घटनेतील 352वे कलम सुधारित स्वरूपात कायम ठेवण्याचा जनता सरकारचा इरादा आहे. हे कलम दुरुस्त स्वरूपात पुढे मांडण्यात येईल. या दुरुस्तीमुळे परकीय आक्रमण झाले किंवा देशात अंतर्गत बंडाळी माजली तर अशा परिस्थितीत सरकार आणीबाणी पुकारू शकेल.
अर्थात याचा फायदा कोणाही हुकूमशाही प्रवृत्तीचा पंतप्रधानांना घेता येऊ नये म्हणून त्या दुरुस्तीत संरक्षण तरतुदींची सोय असेल. आणीबाणी पुकारण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा सल्ला आवश्यक असून संसदेच्या दोन्ही सभागृहातील दोनतृतीयांश सभासदांचा पाठिंबा मिळविला पाहिजे.