“आरती प्रभू’ या नावाने कविता व लेखन करणारे प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म बागलांची राई, तेंडोली (ता. वेंगुर्ले, जि. रत्नागिरी) येथे 8 मार्च 1930 रोजी झाला. वर्ष 1937 मध्ये खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. आर्थिक अडचणी होत्याच. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचे भुसारी मालाचं दुकान होतं, पण ते वर्षभरात बंद केलं आणि खानावळ सुरू केली. सावंतवाडी येथे त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकूरद्वार येथे आले. साधारण जुलै 1948 मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून ते कुडाळला परतले. 1949 मध्ये कुडाळ हायस्कूलमध्ये एसएससीच्या वर्गात दाखल झाले.
4 जानेवारी 1950 रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचवर्षी एसएससीच्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले. त्यांनी व त्यांच्या मातोश्रींनी कुडाळ येथे “वीणा गेस्ट हाउस’ नावाचे लॉजिंग-बोर्डिंग सुरू केले. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करू लागले. “बालार्क’ या शालेय वार्षिकात मे 1950 मध्ये त्यांची “भवितव्य’ ही कविता व “मोगऱ्याची वेणी’ ही कथा व वर्ष 1951 मध्ये “सत्यकथा’ या नियतकालिकात त्यांची “जाणीव’ ही कथा प्रसिद्ध झाली. 10 मे 1952 रोजी तारा भास्कर परुळेकर यांच्याशी खानोलकर यांचा विवाह झाला.
वर्ष 1953 मध्ये “वैनतेय’ साप्ताहिकामध्ये त्यांची “कुढत का राहायचे?’ ही कविता प्रसिद्ध झाली. वर्ष 1954 मध्ये त्यांच्या “येईन एक दिवस’ या पहिल्या नाटकाचा प्रयोग झाला. खानोलकरांच्या लेखनाचा झपाटा अचंबित करणारा होता. एकदा एका रात्रीत “ललित नभी चार मेघ’ या नाटकाचा सुवाच्य अक्षरांत संपूर्ण अंक त्यांनी लिहून काढला होता. “आरती प्रभू’ या टोपण नावाने फेब्रुवारी 1954 मध्ये “सत्यकथा’ नियतकालिकात त्यांची “शून्य शृंगारते’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्यांनी वर्ष 1957 मध्ये आकाशवाणी, पुणे केंद्रावरील कविसंमेलनात भाग घेतला. हे त्यांचे आकाशवाणीवरील पहिले काव्यवाचन होते.
4 मे 1958 रोजी मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या “पल्लवी’ या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. “गुरूकुल’ (लोणावळे), आकाशवाणीचे मुंबई केंद्र आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणी 1959 ते 1965 या कालखंडात त्यांनी नोकरी केली. त्यानंतर मात्र केवळ लेखनास वाहून घेतले. “मौज’च्या अंकात त्यांची कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी “ये रे घना ये रे घना, न्हाउं घाल माझ्या मना’ ही कविता लिहिली. त्यांची “ती येते आणिक जाते, समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभही ही भावगीतेही रसिकांच्या ओठावर आहेत. “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे सामना मधील त्यांचे गीत अविस्मरणीय आहे.
“एक शून्य बाजीराव’चा पहिला प्रयोग 28 मे 1966 रोजी मुंबईत झाला होता. अर्थात, पेशवाईतील बाजीरावाचा या व्यक्तिरेखेशी काहीही संबंध नाही. यातील नायक कधी विदूषकाच्या शैलीत तर कधी भागवतकार, कथाकार किंवा कीर्तनकारांच्या शैलीत दिसतो. यात नायक दुःख, व्यथा, व्याधी व्यक्त करतो. 27 एप्रिल 1976 रोजी त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस