मुंबई, – राज्यात दररोज 3 लाख लोकांचे लसीकरण होत आहे. तसेच खासगी ठिकाणांचीही संख्या वाढविण्यात येत आहे. याशिवाय ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करत आहे. आता 20 बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे या पुढे आणखी जे जे लोकं लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचे आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांबरोबरच, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना राज्यातील करोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, गृहविलगीकरणात ज्यांना ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर त्यांनी स्वतः देखील लक्ष द्यावे आणि अनेकजण सोसायटीमध्ये राहतात, तेथील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्यावर लक्ष ठेवावे. आमचे आरोग्य कर्मचारी देखील त्यांच्यावर ठेवून आहेत. त्यामुळे संसर्ग कसा टाळता येईल, या दृष्टीने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात करोनाबाधित रुग्णसंख्येचा रोज विक्रमी आकडा समोर येत आहे. यात विशेषकरुन मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक आहे. राज्यात 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे.
…तर लॉकडाऊन हा पर्याय
मुख्यमंत्र्यांसोबत काल चर्चा झाली असून करोनाबाधितांची संख्या वाढत राहिल्यास काही शहरात लॉकडाऊन लावावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. यावर उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली 80 टक्के असेल तर इतर ठिकाणी 200 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.