डेहराडून – उत्तराखंडमध्ये नदीमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 31 वर पोहोचली आहे. काल 26 मृतदेह सापडले होते. आज आणखी 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही 175 जण बेपत्ता असून उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या 30 कामगारांच्या सुटकेसाठी अनेक यंत्रणा कार्यरत आहेत.
रायनी गावात चिखलामध्ये दोन मृतदेह सापडले, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आज सकाळी 5 मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 31 झाला असून अद्याप 175 जण बेपत्ता असल्याचे राज्य आपत्कालिन कृती केंद्राने सांगितले. रविवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेले जिवंत सापडण्याबाबतची आशा धूसर झाली आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये “एनटीपीसी’च्या तपोवन विष्णुगड येथील 480 मेगावॅट क्षमतेचा उर्जा प्रकल्प आणि 13.2 मेगावॅट क्षमतेच्या ऋषीगंगा प्रकल्पातील कामगार आणि या प्रकल्पांच्या जवळपास राहणाऱ्या गावकऱ्यांचा समावेश आहे.
दुर्घटना घडली तेंव्हा तपोवन-विष्णुगड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये कार्यरत असलेल्या 30 कामगारांच्या सुटकेसाठी लष्कर, इंडो-तिबेटियन सीमा पोलिस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या समन्वयातून बचाव कार्य केले जात आहे. हे कामगार 12 फूट उंच आणि सुमारे 2.5 किमी लांबीच्या बोगद्यामध्ये अडकले आहेत. बोगद्यातील चिखल उपसण्याचे काम रात्रभर सुरूच होते. बोगद्याच्या मुखाजवळील 120 मीटरचा भाग खुला करण्यात आला आहे, असे “आयटीबीपी’चे प्रवक्ते विवेक कुमार पांडे यांनी दिल्लीत सांगितले. बोगद्याच्या आत शिरून कोणतीही हालचाल करणे शक्य होण्याची “आयटीबीपी’चे जवान वाट पाहत आहेत, असे ते म्हणाले. बचाव पथक आत अडकलेल्यांशी कोणताही संपर्क साधू शकलेले नाहीत. परंतु आत अडकलेले कामगार जिवंत असल्याची आशा आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मलारी येथील पूल वाहून गेल्याने संपर्क तुटलेल्या ग्रामस्थांना हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचवली जात आहे. संपर्क तुटलेल्या 13 गावांमध्ये सुमारे 100 रेशन संच वितरीत करण्यात आले आहेत. या गावांची लोकसंख्या 2,500 इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रैनी पल्ली, पांग, लता, सुरैठोटा, सुकी, भालगाव, तोलामा, फागरसू, लॉंग सेगाडी, गहार, भंग्याळ, जुवागवाडी आणि जुग्जू या गावांचा संपर्क तुटला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली हवाई पहाणी…
मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी बाधित भागाची पहाणी केली. त्यांनी जोशीमठ येथील “आयटीबीपी’च्या रुग्णालयाला भेट दिली आणि तपोवनमधील बोगद्यातून सुटका करण्यात आलेल्या 12 कामगारांचीही भेट घेतली. जनतेला आवश्यक अन्नधान्य आणि इतर वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा, त्यासाठीचे नियोजन त्वरित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. त्याचप्रमाणे या बचावकार्यात गुंतलेल्या जवानानाही आवश्यक गोष्टीच्या पुरवठ्यामध्ये उणीव राहू नये असे आदेशही त्यांनी दिले.