डेहराडून – उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीला तेथे वापरण्यात आलेले किरणोत्सर्गी पदार्थ कारणीभूत असल्याची शंका तेथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या किरणोत्सर्गी पदार्थामुळे तिथे उष्णता निर्माण केली गेली त्यातून मोठ्या प्रमाणात बर्फवितळून नद्यांना पूर आला असावा अशी शंका रैनी गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे असे वृत्त एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
या पुरामुळे ज्या गावाचे सर्वाधिक नुकसान झाले ते म्हणजेच हे रैनी गाव आहे. हे गाव तपोवन परिसरात येते. काहीं गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सन 1965 मध्ये सीआयए आणि आयबीने नंदा देवी भागात एक गुप्त योजना आखली होती. तेथे चीन हद्दीत पाळत ठेवण्यासाठी अण्विक शक्तीवर चालणारी यंत्रणा उभारली जात होती.
पण तेथे त्यावेळी झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे ती यंत्रणा तेथेच टाकून तेथील लोकांना माघारी परतावे लागले होते. त्यावेळी अण्विक पदार्थ असलेले उपकरण तेथेच राहिले. एक वर्षाच्या अवधीनंतर संबंधीत पथकातील काहीं जण तेथे हे उपकरण शोधण्यासाठी गेले असता त्यांना ते उपकरण सापडू शकले नाही.
या अण्विक उपकरणाचे आयुष्य किमान शंभर वर्ष आहे. त्यातून अण्विक किरणोत्सर्ग होऊनच ही दुर्घटना झाली असावी असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दुर्घटनेच्या दिवशी त्या गावातील हवेत विचित्र प्रकारचा वास आला. डोंगर कड्यावरून धूराचेही लोट दिसले आणि त्याच कड्यांचा कडेलोट झाला आणि ते ऋृषी गंगा नदीत पडले.
त्यामुळे तेथे हरवलेल्या अण्विक उपकरणातून किरणोत्सर्ग बाहेर पडून तेथे मोठी उष्णता निर्माण झाली आणि त्यातूनच हे बर्फाचे कडे कोसळून नदीला पुर आला असावा असा गावकऱ्यांचा कयास आहे. 1965 च्या त्या पथकातील जे काही लोक परत आले होते त्याच वेळी त्या पथकातील काहीं लोकांनी या आण्विक उपकरणाबाबत लोकांना माहिती दिली होती.
हे उपकरण बर्फात गाडले गेले आहे. त्यातून किरणोत्सर्ग झाला तर त्याच्या उष्णतेमुळे या भागातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळेल, त्यातून नद्यांना पूर येईल असा धोका त्यांनी त्याच वेळी वर्तवला होता. हे उपकरण शोधून काढून ते नष्ट करण्याची मागणीही सरकारकडे करण्यात आली होती याची आठवणही काही गावकरी सांगतात.
हा विषय सन 2018 साली केंद्रीय पर्यावरण मंत्री सत्पाल महाराज यांनी संसदेत मांडला होता. त्या भागात हरवलेल्या किरणोत्सर्गी उपकरणाचा मोठा धोका हिमनद्यांना आणि तेथील बर्फाच्छिदत प्रदेशाला असल्याचा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता.