लखनौ – उत्तरप्रदेशात उद्या 11 जुलै रोजी टु चाईल्ड पॉलिसी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यांना दोन पेक्षा जास्त मुले आहेत त्यांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार नाही अशी तरतूद यात केली जाणार असून जादा मुले असलेल्यांना अन्य सरकारी योजनांचा लाभही मर्यादित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तरप्रदेशातील निवडणुकीचे राजकारण जसे तापू लागले आहे त्याप्रमाणात तेथील योगी सरकारकडून अशा स्वरूपाच्या घोषणा मोठ्या प्रमाणावर केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टु चाईल्ड पॉलिसीच्या संबंधात उत्तरप्रदेशच्या राज्य विधी आयोगाने त्या विषयाचा एक मसुदाही जारी केला आहे.
या पॉलिसीचा अवलंब न करणाऱ्यांना सरकारी भत्तेही बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एका कुटुंबातील केवळ चार जणांनाच यापुढे रेशन कार्डावरचे धान्य उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव विधी आयोगाने सुचवला असून दोन पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्यांना निवडणुकीलाही उभे राहण्यास प्रतिबंध केला जाणार आहे.