लखनौ – उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने गुरुवारपासून (दि.12) राज्यातील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक केले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी राज्यातील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत सर्व मदरसा कल्याण अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. रजिस्ट्रारने 9 मे रोजी मदरसा कल्याण अधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश जारी केले.
रजिस्ट्रार एसएन पांडे आदेशात म्हणाले, 24 मार्च रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीतील निर्णयानुसार, नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सुरात हे राष्ट्रगीत प्रार्थना करावी.
पांडे म्हणाले की, रमजान महिन्यात मदरशांमध्ये 30 मार्च ते 11 मे या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली होती आणि 12 मेपासून नियमित वर्ग सुरू झाले, त्यामुळे आजपासून हा आदेश लागू झाला आहे. या आदेशाचे पालन व्हावे यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना नियमितपणे देखरेख ठेवावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, या निर्णयावर प्रतिक्रिया देताना योगी सरकारमधील मंत्री दानिश अन्सारी म्हणाले की, ही एक चांगली परंपरा आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मुद्यावरून राजकारण होता कामा नये. ही एक चांगली सुरुवात आहे आणि सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. सामान्य मुस्लिमही त्याचे स्वागत करत आहेत.