नागपूर – केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना संपविण्यासाठी करण्यात येत आहे. यापूर्वी असे कधीही होत नव्हते, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी टीका केली. तसेच नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन विषय वेगळे आहेत. नवाब मलिक यांचे काही आक्षेप एनसीबी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर असतील तर ते असू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
वळसे-पाटील म्हणाले, परमवीर सिंह यांच्या प्रकरणातील चौकशी आयोगाचा अहवाल अजून राज्य सरकारकडे आला नाही. एकदा चौकशी आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे आला की त्यानंतर परमवीर सिंह यांच्या संदर्भात पुढची कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात कोणत्या प्रकरणात त्यांना आरोपी करायचे की नाही, यासंदर्भात न्यायालयीन विषय असल्यामुळे न्यायालयात उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.