लखनौ – आपल्या पिलभीत मतदारसंघातील पूरग्रस्तांकडे उत्तर प्रदेश सरकारकडून झालेल्या दुर्लक्षामुळे त्या मतदारसंघातील खासदार वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तेथील सामान्य माणसांना मदत करण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर येऊन पडत असेल तर सरकार येथे नेमके काय करते आहे हा माझ्या समोर निर्माण झालेला प्रश्न आहे.
तेराईचा बहुतांशी भाग पूरग्रस्त झाला आहे. बरेली आणि पिलभीतच्या भागाला पावसाचा मोठा तडाखा गेल्या दोन दिवसांपासून बसत आहे. सामान्य माणूस जेव्हा अडचणीत असतो अशा वेळी सरकारी प्रशासन मात्र गायब असते. लोकांना रेशन पुरवण्यापासूनच्या साऱ्या समस्या तेथे उद्भवल्या आहेत. अशावेळी व्यक्तिगत पातळीवर मदतीची जबाबदारी पडणार असेल तर सरकारी प्रशासनाला काय अर्थ उरतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या भागातील शारदा आणि दिओहा या नद्यांना पूर आला आहे. त्याच्या काठी असलेल्या अनेक गावांना त्याचा तडाखा बसला आहे. पिलभीतमधील किमान पाचशे गावे पाण्याखाली गेली आहेत. मंगळवारी रात्री पिलभीतच्या जिल्ह्या प्रशासनाने तेथे अडकलेल्या काही माणसांना वाचवण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्सची मदत मागवली. वरुण गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.