लेफ्ट. जन. राजेंद्र निंभोरकर यांचे मत
पुणे – मुंबई हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक झाले असते, तर उरी व पठाणकोट हल्ले झाले नसते. सर्जिकल स्ट्राइकने भारतीय सेना शक्तिशाली आहे, हे जगाला दाखवून दिले आहे. भारतातील केवळ 15 लोकांनाच या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. भारत सरकारने सैन्याला पूर्ण मुभा व साहित्य दिल्याने आम्ही सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करु शकलो,’ असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी केले.
अफजलखान वधाचा दिवस हा शिवप्रताप दिन म्हणून समस्त हिंदू आघाडीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांना हिंदवी स्वराज्यभूषण वीर जीवा महाले पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, मिलींद एकबोटे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, ऍड. मोहन डोंगरे, दीपक नागपुरे, तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, संदीप महाराज पळसे, मनोज पवार, कृष्णाजी पाटील, संजय जढर, सचिन जामगे आदी उपस्थित होते. हिंदूत्व शौर्य पुरस्काराने संजय शर्मा यांना आणि मुकेश पाटील, सचिन पाटील यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर रंगराव पाटील व सहकाऱ्यांनी पोवाडा सादरीकरण केले. तर, तुकाराम चिंचणीकर यांनी शिवरायांची आरती सादर केली. सौरभ कर्डे यांनी अफजलखान वधाचा प्रसंग सांगितला. नंदकिशोर एकबोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.