पाटणा – बिहारमध्ये जातगणनेचा अहवाल काल जाहीर करण्यात आल्यानंतर त्या राज्यात आता चांगलाच राजकीय गदारोळ सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने यावर संताप व्यक्त करत सरकारने आकड्यांमध्ये हेराफेरी केली असल्याचा अर्थात गडबड केली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी केला आहे.
याबाबत बोलताना चौधरी म्हणाले की तृतीय पंथी आणि धानुक समाजाने आपला आक्षेप नोंदवला असून आमची संख्या कमी दाखवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिमागास वर्गातील अनेक जातींचा इतर वर्गात समावेश करून गडबड करण्यात आली आहे.
लाखो नागरिकांची गणनाच झालेली नाही आणि आमची जात विचारायला कोणी आलेच नव्हते अशा तक्रारही अनेक लोकांनी केल्या आहेत. जातगणना नक्की कोणत्या कार्यपध्दतीद्वारे केली गेली अशी विचारणा करतानाच चौधरी म्हणाले की बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची जात वेगळी आहे तर त्यांच्या पत्नीचा धर्मच वेगळा आहे.
बिहारमध्ये आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह ही सामान्य बाब आहे. अनेक जणांचे असे विवाह झाले आहेत. मात्र या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह झालेल्यांची गणना कशी केली गेली अशी विचारणाही चौधरी यांनी केली.
लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या हिंमत असेल तर त्यांनी आपापल्या पदांचा त्याग करावा. अतिदलित वर्गातील कोणाला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करावे तेंव्हाच आम्ही असे मानू की हे खरेच त्या वर्गाचे पाठीराखे आहेत.