जयपूर – राजस्थानात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या घोषणापत्रासाठी भाजपने आता सूझाव आपका- संकल्प हमारा नावाचे एक अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत भाजपने मतदारांकडून सूचना मागवल्या आहेत. 20 दिवस अभियान चालणार असून त्याकरता एक वेबसाइट एक टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल म्हणाले की, उद्या म्हणजे बुधवारी दुपारी जयपूर येथे या कार्यक्रमाची सुरूवात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते केली जाणार आहे. त्याचवेळी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवल्या जाणाऱ्या 51 रथांना नड्डा यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
जिल्हा आणि तालुका स्तरावर हे रथ जातील आणि आमच्या घोषणापत्रासाठी नागरिकांच्या सूचना जाणून घेतील. त्यांच्या या सूचनाच आमचा संकल्प असेल. नड्डा यांच्या हस्तेच टोल फ्री क्रमांक आणि वेबसाइटही जारी केली जाईल. येथील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश पातळीवरील अन्य नेतेही उपस्थित होते.