लखनौ – विधानसभा निवडणुकांमधील विक्रमी विजयानंतर उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकांमध्ये देखील भाजपची घौडदौड मोठ्या विजयाच्या दिशेने सुरु आहे. राज्यात विधान परिषदेच्या १०० जागा असून त्यापैकी ३६ रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. भाजपला ३० जागांवर आघाडी मिळाली असून ९ जागा बिनविरोध झाल्याने भाजपने त्या आधीच खिशात घातल्या आहेत.
मोदींच्या मतदारसंघात भाजपचा पराभव
राज्यात भाजपला सर्वत्र मोठं यश मिळालं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये झटका बसला आहे. वाराणसी विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे. येथील बाहुबली ब्रिजेश सिंह यांच्या पत्नी अन्नपूर्णा सिंह यांनी मोठा विजय मिळवला असून भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. २०१६ मध्ये ब्रिजेश सिंह यांनी येथून अपक्ष लढत विजय मिळवला होता. मात्र यावेळी भाजपने पश्चिमी उत्तर प्रदेशातील वाराणसी विधान परिषदेची जागा प्रतिष्ठेची केली होती.
वाराणसी येथील पराभव वगळता राज्यात विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मोठं यश मिळाल्याने भाजपच्या गोटात आनंदी-आनंदच आहे. येथील अंतिम निकाल जाहिर झाल्यानंतर दोन्ही सभागृहात बहुमत असल्याचे चित्र अनेक दशकांनंतर पाहायला मिळणार आहे.
योगींनी गड राखला
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पूर्वीच्या सरकारमध्ये विधान परिषदेचे (MLC) सदस्य होते. यंदा त्यांनी प्रथमच विधानसभा लढवत विजय प्राप्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जाणारा गोरखपूर भाजप जिंकत आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी विधान परिषद निवडणुकीतील हा विजय पक्षातील त्यांचं वजन आणखी वाढवणार आहे.
समाजवादी पक्षाच्या हाती निराशा
विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाने चांगली कामगिरी केली होती. पक्षाला येथे तीन आकडी जागा मिळाल्या मात्र भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात यश आले नाही. विधान परिषदेमध्ये मात्र समाजवादीच्या हाती एकही जागा न लागल्याने त्यांची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले.
कशी होते विधान परिषदेची निवडणूक?
उमेदवारांना विधान परिषद अथवा वरच्या सभागृहात लोकप्रतिनिधींमधून निवडून जावे लागते. खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच या निवडणुकांमध्ये मतदान करतात. ही निवडणूक द्विवार्षिक असल्याने उमेदवारांना विधान परिषद सदस्य म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ मिळतो.